तर जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका महाविकास आघाडीकडे : अजितदादांचे भाकित

मुंबई नगरी टीम

मुंबई । आपल्या मतांची विभागणी न होवू देता आपण जागा वाटपामध्ये यशस्वी झालो तर जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिका महाविकास आघाडीकडे यायला निश्चितपणे मदत होईल असे वैयक्तिक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र पणे लढवणार असल्याचे स्टेटमेंट प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. कुणी काय स्टेटमेंट द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न व अधिकार आहे पण उद्याच्या निवडणूकांना सामोरे जात असताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवायची की दोघांनी की,स्वतंत्र लढवायची हा तिथल्या जिल्ह्याला अधिकार द्यावा असेही वैयक्तिक मत पवार यांनी व्यक्त केले. आपण इथे बसून ठरवलं तर उदाहरणार्थ गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर इथली परिस्थिती काय असते ते माहित नसते. आपण त्यांच्यावर सोडलं तर ते या सगळ्याचा साखल्याने विचार करतात असेही पवार म्हणाले.तिथले लोक रोज राजकारण आणि समाजकारण करत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा परंतु सध्या तरी प्रत्येकजण आपापला पक्ष वाढण्याच्यादृष्टिने प्रयत्न करतोय असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleकाँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर संधी मिळणार ?
Next articleनिर्दोष मुक्तता होताच आक्रमक छगन भुजबळ काय म्हणाले ?