१४ कोटी ५६ लाखांच्या बोगस नोटांचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांनी दाबले : मलिकांचा आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई । अल्पसंख्यांकमंत्री यांच्या आरोपांच्या फैरी सुरूच असून,१४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटा ज्या पकडण्यात आल्या. त्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनतर मलिक यांनी आज ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार असल्याचा इशारा दिला होता. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मलिक यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.२०१७ आयएसआय,पाकिस्तान व्हाया बांग्लादेश यांच्यामार्फत बोगस नोटा संपूर्ण देशात पसरवल्या गेल्या.८ ऑक्टोबरच्या छापेमारीत १४ कोटी ५६ लाख पकडण्यात आले. त्या प्रकरणी मुंबईत एकाला अटक झाली. एकाला पुण्यात अटक करण्यात आली.त्यामध्ये इम्रान आलम शेख,रियाज शेख यांची अटक झाली. नवीमुंबईमध्येही कारवाई झाली. पंरतु १४ कोटी ५६ लाख बोगस नोटांमधून ८ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले.पाकिस्तानची बोगस नोट भारतात चालावी या प्रकरणी एक प्रकरण दाखल होते आणि मात्र काही दिवसातच जामीन मिळला.मात्र हे प्रकरण एनआयकडे कडे दिले नाही. या नोटा कुठून आल्या.याची अंतिम चौकशी झाली नाही असे सांगतानाच जे बोगस नोटांचे रॅकेट चालवत होते, त्यांना तत्कालिन सरकारचे संरक्षण होते असा आरोप मलिक यांनी केला.

या प्रकरणात काँग्रेसचा नेता असल्याचा कट रचण्यात आला.मात्र तो कधीच काँग्रेसचा नेता नव्हता. परंतु पकडला गेला तर याचा गुन्हा काँग्रेसवर दाखल करण्याचा कट आखला गेला होता. इम्रान अली शेख याचा छोटा भाऊ हाजी अराफत शेख याला अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनविण्यात आले. हाजी अराफत शेख याला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात घेऊन त्याला अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी बसवले.फडणवीस यांनी मुन्ना यादवसारख्या कुख्यात गुंडाला अध्यक्ष बनवले. हैदर आलमला मौलाना आझाद महामंडळाचा अध्यक्ष बनवले. जो बांग्लादेशींना वास्तव्य देतो. त्याला अध्यक्ष करता, जो बोगस नोटांचे रॅकेट चालवतो. छोटे मोठे कार्ड छापून काँग्रेसचा नेता म्हणून दुसऱ्या पार्टीत जातो आणि काम तुमच्यासाठी करतो. नंतर त्याला आपण आयोगाचा अध्यक्ष करता अशी विचारणा मलिक यांनी केली. २००८ मध्ये जो अधिकारी मुंबईत विभागीय अधिकारी म्हणून पदावर येतो. तो १४ वर्ष मुंबई शहर सोडत नाही. यामागे काय राज लपलं आहे. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांवर अंडरवर्ल्ड कनेक्शनचे बोट दाखवत आहेत. फडणवीस सगळे अंडरवर्ल्डचे लोक जे मोठ मोठे गुन्हेगार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री असताना त्या सर्व लोकांना सरकारी महामंडळ मिळवून दिले. त्यांना महामंडळाचे अध्यक्ष का बनवले,मुन्ना यादव नागपूरचा कुख्यात गुंड आहे. ज्याच्यावर हत्या आणि इतर सर्व गुन्हे नोंद आहेत. जो आपलं राजकीय भय निर्माण करणारा तुमचा सोबती आहे. त्या मुन्ना यादवला महामंडळाचा अध्यक्ष बनवला होता की नाही ? तुमच्या गंगेत आंघोळ करुन मुन्ना यादव पवित्र झाला होता का ? असे अनेक प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले आहेत.

हैदर आजम नावाच्या एकाला मौलाना आझाद मंडळाचा अध्यक्ष बनवला होता की नाही ? हैदर आजम बांग्लादेशी लोकांना मुंबईत स्थायिक करत आहे की नाही ? त्याची दुसरी पत्नी बांग्लादेशी आहे. जिची चौकशी मालाड पोलिसांनी सुरु केली. २४ पोलिस ठाण्यात कागद पाठवण्यात आले. बंगाल पोलिस जन्मदाखला व इतर कागदपत्रे बोगस आहेत की नाही, याची चौकशी करत होती. त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करण्यात आला व ते प्रकरण दाबण्याचे काम केले की नाही ? तुमच्या इशाऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून वसूली केली जात होती की नाही ? मुंबईचे प्रकरण असो की बिल्डरांच्या जमिनीचे असो पोलिस ठाण्यात प्रकरण दाखल करुन वसुली केली जात होती की नाही ? जमीन मालकांना पकडून आणून सर्व जमिनी नावावर केल्या जात होत्या हे सत्य आहे की नाही ? तुमच्या कार्यकाळात विदेशातून कॉल येत होते की नाही? कुख्यात गुंड कॉल करत होते की नाही? असे एक ना अनेक प्रश्न फडणवीस यांना मलिक यांनी केले.

फडणवीस यांनी काही आरोप केले. त्याचा खुलासा कालही मलिक यांनी केला. परंतु आज त्यात अधिक माहिती दिली आहे. फडणवीस यांनी मंत्री असताना सलीम पटेलबाबत माहिती नव्हती का ? असा प्रश्न केला होता. मुळात २००५ साली मंत्री नव्हतो असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. आरआर पाटील यांच्यासोबत त्यावेळी फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला गेला. आम्ही मुनिरा यांच्याकडून संपत्ती घेतल्यानंतर सलीम पटेल यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. सलीम पटेल यांनी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये दाऊद कनेक्शन असल्याचे सांगितले होते. त्यावर न्यायालयात खटला दाखल झाला. पाच महिन्यांपुर्वी सलीम पटेल यांचे निधन झाले. सलीम पटेलने मुनिरा यांचे मुखत्यारपत्र घेतले होते. सरदार वलीखानबाबत फडणवीस बोलले की, बॉम्बस्फोट आरोपीकडून संपत्ती घेतली. परंतु तो २००५ मध्ये संशयित नव्हता. जो वॉचमन होता तो त्याचा मुलगा होता. याच जागेपासून ३०० मीटरवर स्वतःचे नाव लावले होते. त्यावेळी ती जागा घेण्यासाठी पैसे दिले, हे सत्य आहे असेही मलिक यांनी सांगितले.फडणवीस तुम्ही राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे असा थेट आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

रियाज भाटी कोण आहे, याचे उत्तर फडणवीस तुम्ही द्या. २९ ऑक्टोबर रोजी सहारा विमानतळावर रियाज भाटी बोगस पासपोर्ट प्रकरणात पकडला गेला. ज्याचे दाऊद इब्राहीम गँगसोबत संबंध आहेत. त्यावेळी संपूर्ण शहराला माहीत होते रियाज भाटी कोण आहे. डबल पासपोर्ट प्रकरणात अटक होते आणि दोन दिवसात सुटतो. यामागे काय खेळ आहे अशी विचारणाही मलिक यांनी यावेळी केली. रियाज भाटी भाजपच्या कार्यक्रमात सतत का दिसत होता. फडणवीस तुमच्यासोबत डिनर टेबलवर काय करत होता ? देशाच्या पंतप्रधानांवर आरोप लावत नाही. परंतु पंतप्रधान मोदीजी जेव्हा मुंबईत आले होते, त्यावेळी रियाज भाटीने त्यांच्यासोबत फोटो काढले होते. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कुणाला घ्यायचे, कुणाला पास द्यायचा, याचे पुर्ण स्कॅनिंग केले जाते. मात्र कोणत्याही चौकशी शिवाय रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत पोहोचला कसा ? याचे काय कारण होते. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात सर्व गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवण्यात आले. बोगस नोटांचे रॅकेट तुम्ही चालवता. रियाज भाटीच्या माध्यमातून वसूली केली जाते. ठाण्यात बसवून संपुर्ण महाराष्ट्रातून वसूली केली. विदेशातून कुख्यात गुंड कॉल करून वसुली करत होते. हा सगळा खेळ देवेंद्र तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सुरु होता असा थेट हल्लाही मलिक यांनी केला. आज इतकंच सांगतोय. देवेंद्रजी तुमचे अजून काही काळे कारनामे आहेत ते काही दिवसात समोर आणेन असा इशाराही मलिक यांनी यावेळी दिला.

रियाज भाटी हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत का फिरतो ? दोन पासपोर्टसोबत अंडरवर्ल्डचा माणूस सापडत असेल तर त्याला दोन दिवसात कसे सोडले जाते ? पंतप्रधानांच्या कार्यक्रमात त्याचे व्हीआयपी पास कसे बनवले जातात. बोगस नोटांचे रॅकेट उघड होते, परंतु ते दाबले जाते. पैसे कुठून आले, कुठे जात होते. याची साधी चौकशी का केली नाही? मुन्ना यादव हा कुख्यात गुंड नाही का? याचे उत्तर देवेंद्रजी यांनी द्यावे. सांगावे की मुन्ना यादव गुन्हेगार नाही नवाब मलिक खोटं बोलत आहे. रियाज भाटी सध्या फरार आहे. मुन्ना यादववर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बोगस नोटांचे प्रकरण डीआयआरकडे आहे. ज्या केंद्रीय यंत्रणा चौकशा करतात, त्यांनी याकडे लक्ष द्यावे. बोगस नोटांचे रॅकेटचे पाकिस्तान कनेक्शन कसे आहे, हेही पाहिले पाहिजे अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली.१४ कोटी ५६ लाख पकडण्यात आले बोगस नोटांचे प्रकरण होते. मग लगेचच जामीन कसा झाला. चौकशी का झाली नाही? जो पकडला त्याच्या भावाला अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवला. हा योगायोग आहे? या केसचा इन्चार्ज हा समीर दाऊद वानखेडे त्यावेळी होता. डीआयआरमध्ये केस होती. १४ वर्ष वानखेडे मुंबईत आहे. १ जुलै २०१७ ला त्याचवेळी हे डिपार्टमेंट त्याच्याकडे होते. ही छापेमारी डीआरआयने केली होती. केस दाबण्यासाठी याच अधिकाऱ्यांचा वापर देवेंद्र फडणवीस यांनी केला होता असा घणाघाती आरोपही मलिक यांनी केला.

हाजी अराफत शेखच्या भावाचे प्रकरण दाबले. हा योगायोग असू शकतो. एकच अधिकारी ज्याच्यावर गंभीर आरोप आहेत. दोन एसआयटीच्या माध्यमातून त्याची चौकशी सुरु आहे. विजिलन्सकडून चौकशी होतेय आणि त्यामुळे त्यावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे यावरुन स्पष्ट होत आहे असेही मलिक म्हणाले.रियाज भाटीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या नेत्यांसोबत काही फोटो आहेत. रियाज भाटी प्रकरणावरुन काय खुलासा होतोय याची वाट बघतोय. रियाज भाटी कुणासोबत फोटो काढतोय, याला काही अर्थ नाही. प्रश्न हा आहे की, दोन पासपोर्टसोबत जर आरोपी पकडला जातो. तर दोन दिवसात कसा सुटतो. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात त्याला व्हिआयपी पास कसा मिळतो. फोटो कुणाच्या लग्नात काढला, याबद्दल मी बोलत नाही. कुठल्या मंत्र्यांसोबत, नेत्यांसोबत फोटो आहेत. मा माझा आरोप नाही. दोन पासपोर्टसहीत कुख्यात गुंड पकडला जातो. दोन दिवसात कसा सुटतो. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचे संरक्षण त्याला होते असा हल्लाबोलही मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला.मुन्ना यादव शासकीय समितीवर अध्यक्ष होता की नाही?हाजी अराफत शेख चेअरमन होता की नाही? हैदर आजम मौलाना आझाद महामंडळाचा अध्यक्ष होता की नाही? अशा पदावर येण्याअगोदर पोलिसांकडून रिपोर्ट मागवण्यात येतो मग यांचे रिपोर्ट पोलिसांनी दिले की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करत नवाब मलिक यांनी या सर्वांना बक्षिसी देवेंद्र फडणवीस यांनी देण्याचा प्रयत्न केला असा आरोपही मलिक यांनी केला.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात १३ लोकांना चिन्हीत करण्यात आले. पहिल्यांदा के.पी. गोसावी आणि मनिष भानुषाली प्रकरणावर प्रकाश टाकल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. प्रभाकर साहील याने चिन्हीत लोकानांच पकडण्याचा आदेश होता असा जबाब दिला आहे. छापा क्रूझवर टाकला तर क्रूझला विनापरवाना परवानगी कशी दिली. क्रूझवर तपासणी का झाली नाही? आर्यन खानला कुणाच्या सांगण्यावरुन आणण्यात आले. त्याच्या कुटुंबाकडे २५ कोटींची मागणी करण्यात आली. १८ कोटींची डील झाली. ६० लाख का घेतले गेले. हे सर्व प्रश्न दोन्ही एसआयटी समोर आहेत. सीसीटीव्ही फुटेज आहे. शिवाय काही पुरावेही आहेत असेही मलिक म्हणाले. लोकांना घाबरवले जात आहे की, तुम्ही पैसे दिलेत. तुम्हीही फसाल. खंडणी मागणारा गुन्हेगार असतो. आपल्या मुलाला सोडवण्यासाठी पैसे देणारा गुन्हेगार नाही. तो साक्षीदार असतो हे पुन्हा सांगतोय… तुम्ही घाबरू नका. घाबरलात तर या शहरात अशाच प्रकारची वसुली सुरु राहिल असे आवाहनही मलिक यांनी केले. एनसीबीला २६ प्रकरणाचे पत्र लिहिले आहे. २६ बोगस प्रकरणे आहेत. अपहरण करुन खंडणी वसुल केली जात असेल तर याची चौकशी चार अधिकारी करत आहेत. जे सत्य आहे, ते समोर येईलच. मी बोलतोय ते सत्य आहे. गृहविभागाला याची माहिती देणार आहे असेहीमलिक यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी सीबीआय तुमची वाट बघतेय असे लिहित आहेत तर काहीजण तुरुंग तुमची वाट बघतोय असे सोशल माध्यमातून बोलत आहेत. मी गुन्हा केला असेन तर तुरुंगात जाईन. परंतु जर कुणी पावडरच्या पैशातून अल्बम बनवत असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही मलिक यांनी केली. माझ्यावर चौफेर टीका होतेय. माझ्या काळ्या संपत्तीवर बोललं जातंय पण एवढंच म्हणेन चोर मचाये शोर… यांची काळी संपत्ती वेळ आल्यावर नक्की काढेन. वरळीमध्ये २०० – २०० कोटींचे फ्लॅट कुणाच्या नावाने आहेत. हे सगळे आहे परंतु हा सगळा बेनामी संपत्तीचा विषय नाही. हे नंतर काढू असे स्पष्ट केले. मी महिलांच्या विरोधात काही बोलणार नाही. मी महिलांचा आदर करतो. माझ्यावर कितीही त्यांनी बोट दाखवले तरी त्याचे उत्तर देणार नाही. माझी लढाई ही अन्यायाविरोधात असल्याचेही मलिक यांनी शेवटी स्पष्ट केले.

Previous articleमंत्रिमंडळाचा निर्णय : मुंबई महानगरपालिकेत ९ नगरसेवक वाढणार
Next articleएसटी कर्मचा-यांचा तळतळाट ठाकरे सरकारला भोगावा लागेल : दरेकरांची सरकारवर टिकेची झोड