देवेंद्र फडणवीसांवर खोटारडे आरोप करून नवाब मलिक स्वतःची कबर खणत आहेत

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी नवाब मलिक यांचे गैरव्यवहार उघडकीस आणल्यानंतर मलिक सैरभैर झाले आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आणि खोटारडे आरोप करून ते स्वतःची कबर स्वतःच खणत आहेत.आम्ही सर्वजण एकजुटीने फडणवीस यांच्या पाठीशी आहोत, असे भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, नवाब मलिक हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करणार होते पण त्यांनी प्रत्यक्षात फुसके आरोप केले.फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवाब मलिक हादरले आहेत आणि सैरभर झाले आहेत. टाडाच्या आरोपींकडून कवडीमोल किंमतीने जमीन खरेदी केल्याचे ते स्वतःच मान्य करत आहेत.मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हेगारांना मदत केल्याचा आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा आरोप केला. भारतीय जनता पार्टी हा आरोप स्पष्टपणे फेटाळते. भाजप फडणवीस यांच्या पाठीशी आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.फडणवीस यांनी आता एकाच विषयाची माहिती उघड केली आहे. त्यांच्याकडे अधिक माहिती आहे. ते त्यांच्याकडे असलेली माहिती योग्य यंत्रणांकडे सादर करणार आहेत. त्यानुसार जी चौकशी आणि कारवाई होईल त्याला तोंड देण्याचा विचार नवाब मलिक यांनी करावा. कोणावर तरी निष्ठा दाखविण्यासाठी फडणवीसांवर आरोप करत मलिक खड्ड्याच्या दिशेने धावत आहेत, असे पाटील म्हणाले.

ते म्हणाले की, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना पाठिंबा देण्याने राजकारण होत असेल तर भाजपा ते राजकारणही करेल. राज्य सरकारने गेल्या १७ महिन्यांचा पगार द्यावा आणि पंधरा हजार रुपये बोनस द्यावा या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ताबडतोब मान्य केल्या पाहिजेत आणि त्यांच्या इतर मागण्यांबाबतही चर्चा केली पाहिजे.

Previous articleएसटी कर्मचा-यांचा तळतळाट ठाकरे सरकारला भोगावा लागेल : दरेकरांची सरकारवर टिकेची झोड
Next articleगरिबांना लुटायचे आणि उद्योगती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम