सत्ता पाहिजे ना, मी तुमच्या सोबत येतो,मला तुरूंगात टाका ! मुख्यमंत्री विरोधकांवर कडाडले

मुंबई नगरी टीम

मुंबई । मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तांवरून सातत्याने निशाणा साधला जात आहे.तसेच मालमत्तांवर ईडीकडून काही जप्तीच्या कारवाया करण्यात येत आहेत.त्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.रावणाचा जीव बेंबीत होता.केंद्रात सत्ता मिळाली तरी काहींचा जीव मुंबईत आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. काहींना आरशात बघितले तरी भ्रष्टाचार झाला असे वाटते अशा कानपिचक्याही त्यांनी विरोधकांना दिल्या.वाईन विक्रीवरून त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावत मध्यप्रदेश उत्तरप्रदेशात किती दारू विक्री होते याची आकडेवारी सादर केली.आमच्यावर टीका करा पण राज्याची बदनामी करू नका असेही त्यांनी विरोधकांना सुनावले.रावणाचा जीव बेंबीत होता.केंद्रात सत्ता मिळाली तरी काहींचा जीव मुंबईत आहे असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.सध्या केंद्रीय तपास यंत्रणाचा सुरू असलेल्या गैरवापरावरही त्यांनी भाष्य केले. केंद्रीय तपास यंत्रणा पोकळ झाल्या आहेत का ? असा सवाल त्यांनी करून नवाब मलिक पाच वेळा निवडून आले.त्याच्यावर ईडीने कारवाई केली.बाण म्हणजे यंत्रणा आहे असून सांगून ईडी की घरगडी आहे असा सवालही त्यांनी केला.तुम्हीच आरोप करणार.तुम्हीच पुरावे देणार आणि धाडी पण तुम्हीच टाकणार असेही ते म्हणाले.यापुर्वी राम मंदिराच्या नावे मते मागितली आता दाऊदच्या नावाने मते मागणार का ? असा सवाल त्यांनी करून,दाऊद कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला.ज्याप्रमाणे बराक ओमाबा यांनी लादेनला त्यांच्या घरात घुसून मारला तसे तुम्ही का केले नाही असे ते म्हणाले.

माझे विचार बदलणार नाही असे ठणकावून सांगत मी कडवा हिंदुत्ववाही आहे आणि राहणारच असेही ठणकावले.तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.आज तुम्ही आमच्या कुटुंबाची जी काही बदनामी करत आहात,ती केली असती का,असा सवाल त्यांनी केला.हर्षवर्धन पाटील जे पुर्वी कॅांग्रेस मध्ये होते तेव्हा त्यांना झोप लागत नव्हती. मग झोपेचे औषध घेतले. तिकडे जाऊन झोपायला लागले. हा अनुभव काही त्यांनी कानात नाही तर एका सभेत सांगितला आहे. तर असे काय तुमच्याकडे झोपेचे औषध आहे मला कळत नाही, असे खडेबोल मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.जे काही आरोप करायचे आहेत ते माझ्यावर करा,चला मी तुमच्या सोबत येतो मला तुरुंगात टाका,मी जातो तुरुंगात पण माझ्या कुटुंबियांवर कशाला आरोप करता,आम्ही कधी काढलेय का तुमच्या कुटुंबियांचे ? असा खोचक सवालही त्यांनी केला महाभारतात शिखंडीला मध्ये घालून कर्णाचा वध केला तसे काही जण करत असतील.पण मला हल्ली कळतच नाही कोण शिखंडी आहे आणि कोण मध्यस्थ आहे. माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी मी घेतो चला मी येतो तुमच्या सोबत असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.महाभारतात शिखंडीला मध्ये घालून कर्णाचा वध केला तसे काही जण करत असतील. पण मला हल्ली कळतच नाही कोण शिखंडी आहे आणि कोण मध्यस्थ आहे. तसेच आज काल कोण केंद्रीय यंत्रणांचे दलाल झालेत की प्रवक्ते झालेत काय कळायला मार्ग नाही.कोणी तरी म्हणतं की, अनिल देशमुख तुरुंगात जाणार अनिल देशमुख गेले तुरुंगात. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्यावरून रोज कोणी तरी म्हणतं होते. तुम्ही त्यांचा दाऊदशी संबध असल्याच्या कारणावरून राजीनामा मागताय.पूर्वी तुम्ही राम मंदीराच्या नावावर मते मागितली आता काय दाऊदच्या नावावर मते मागणार आहात का ? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

मंत्री अनिल परब यांच्या घराचे अनधिकृत बांधकाम झाले म्हणून ते तुम्ही पाडले. हरकत नाही मग सगळ्यांचीच अनधिकृत बांधकाम पाडा ना,असा सूचक इशारा देत १९९३ च्या दंगलीत हिंदूना वाचविण्यासाठी हा अनिल परब रस्त्यावर गेला होता.तेव्हा पोलिसांनी आणि लष्कराने त्याला लोळवस्तोवर मारला होता.त्याच्या घरावर पाडकामाची कारवाई करता असा सवाल करत महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाप्रश्नावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या आंदोलन करत होत्या. त्यावेळी त्यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला खोच पडली त्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता असा उपरोधिक सवालही त्यांनी विरोधकांना केला.त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बहिणाबाई चौधरी यांची माणसा माणसा तुला हाव तरी किती, तुझे इतभर पोट त्यात मावणार किती, माणसा माणसा तुझी नियत किती खोटी तुझ्या परीस जनावर बरी गोठ्यातली, माणसा माणसा तु माणूस कधी होणार या बहीणाबाईंच्या कवितेचे वाचन करून आपले भाषण संपविले.

Previous articleआता बीडीडी चाळींना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,शरद पवार,राजीव गांधींचे नाव
Next articleएसटी कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा ! कोणाचीही नोकरी जाणार नाही