धनंजय मुंडेंचा जनता दरबार सुरू असतानाच गेली लाईट ; मोबाईलच्या उजेडात जनतेच्या प्रश्नांची केली सोडवणूक

मुंबई नगरी टीम

बीड । देशात सध्या कोळशाच्या टंचाईमुळे अनेक राज्यांमध्ये सोळा सोळा तास लोडशेडिंगचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे.महाराष्ट्रात मात्र परिस्थिती सामान्य आहे, मात्र अतिरिक्त लोड किंवा तत्सम कारणांनी अचानक लाईट जाणे किंवा बिघाड होणे याला मात्र पर्याय उरत नाही, त्यातच अचानक लाईट गेल्यानंतर हातातले काम सुरू ठेवण्यासाठी मोबाईल फ्लॅशच्या उजेडाचा वापर करून आजकाल चालू काम पूर्ण केले जाते.याच पद्धतीने जनता दरबारात असताना अचानक लाईट गेल्याने जनतेची निवेदने सोडविण्यात मग्न असलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोबाईल फ्लॅशच्या उजेडात आपले काम सुरू ठेवल्याचे पहावयास मिळाले.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे आपल्या खास कार्यशैलीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहेत.एखादी समस्या त्यांच्यासमोर मांडली तर ती कोणत्याच परिस्थितीत अनुत्तरित राहत नाही, याची प्रचिती त्यांच्या भेटी-गाठी व जनता दरबारातून अनेकांना अनेकवेळा आलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारातून अनेकांची कामे जागच्या जागी मार्गी लागतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.परवा बीड शहरात असताना धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार उपक्रमांतर्गत जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांची निवेदने स्वीकारली.शक्य तेवढ्या जास्तीत जास्त निवेदनावर जागच्या जागीच संबंधितांना फोन करून,पत्र देऊन किंवा सूचना करून ते निवेदन निकाली काढण्याचा मुंडेंचा शिरस्ता आहे.या जनता दरबारात देखील त्याचप्रमाणे निवेदनांवर कारवाया करणे सुरू असताना अचानक लाईट गेली, तर चक्क मोबाईल फ्लॅशच्या उजेडात धनंजय मुंडे यांचे कामकाज सुरू असल्याचे पाहायला मिळाले. पुढील काही मिनिटात लाईट आली मात्र जनता दरबार मात्र विना व्यत्यय पार पडला.बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकत्रित जबाबदारी पार पाडत असलेले धनंजय मुंडे हे मुंबई व्यतिरिक्त परळी, अंबाजोगाई,बीड,परभणी असे विविध ठिकाणी सातत्याने जनता दरबार उपक्रमांतर्गत जनतेच्या समस्या जाणून घेत असतात. या उपक्रमातून प्राप्त झालेल्या प्रत्येक निवेदनावर समाधानकारक कारवाई व्हावी,असा मुंडेंचा हमखास प्रयत्न असतो, त्यामुळे त्यांच्या जनता दरबारास मोठी गर्दी पहावयास मिळते.

Previous articleमविआकडून ओबीसींच्या पाठीत खंजीर; मात्र भाजप ओबीसींना २७ टक्के तिकिटे देणार
Next articleओबीसींच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने अडीच वर्ष काय केले ? पंकजा मुंडेंचा सवाल