राज्यसभा निवडणूक : धनंजय महाडिकांमुळे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचा ‘भाव’ वधारला

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविल्याने राज्यसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.आज भाजपकडून पियुष गोयल,अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी तर राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल आणि काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.सहा जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाल्याने या जागेवर भाजप की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.सहावी जागा आम्हीच जिंकणार असा दावा भाजप आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.भाजपचे धनजय महाडिक यांनी निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतल्याने छोटे पक्षाचे आणि अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे.

येत्या १० जून रोजी महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होत असून,६ जागांसाठी एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.शिवसेनेकडून संजय राऊत,संजय पवार यांनी तर भाजपकडून पियुष गोयल,अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांनी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारांना विजयासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे.सध्या भाजपचे १०६ आमदार असून,पक्षाला ५ अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.त्यामुळे भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी १५ मतांची आवश्यकता आहे.विधानसभेत शिवसेनेचे ५5 ( रमेश लटके यांचे निधन ) ,राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत.विधानसभेत बहुजन विकास पक्ष ३, समाजवादी पार्टी २,एमआयएम २, प्रहार जनशक्ती पक्ष २,मनसे १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( मार्क्सवादी) १, शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य शक्ती पक्ष १.क्रांतिकारी शेतकरी पक्ष १ असे छोट्या पक्षांचे १६ तर १३ अपक्ष आमदार आहेत.अपक्षांपैकी मंजूळा गावीत चंद्रकांत पाटील,आशिष जैसवाल,नरेंद्र भोंडेकर,किशोर जोरगेवार,गीता जैन.संजय शिंदे आणि राजेंद्र यड्रावकर हे अपक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करू शकतात तर प्रकाश आवाडे,राजेंद्र राऊत महेश बादली,विनोद आग्रवाल आणि रवी राणा हे भाजपला मदत करण्याची शक्यता आहे.मनसेचे एकमेव आमदार असून,मनसे भाजपला मदत करण्याची शक्यता आहे.

बहुमत सिद्ध करताना महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदारांचे पाठबळ होते.त्यामुळे महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून येण्यासाठी ९ मतांची आवश्यकता आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी खुल्या पद्धतीने मतदान होणार असल्याने मते फुटण्याची शक्यता कमी असल्याने छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मतांवर महाविकास आघाडीच्या आणि भाजपच्या सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.येत्या १ मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून,उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३ जून आहे.भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्यास राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होवू शकते.अन्यथा छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील
राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे पण विरेधी पक्षाने या परंपरेला तिलांजली दिली आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान होत असते, महाविकास आघाडीकडे बहुमत असून आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील,असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

मविआला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो
भाजपला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील. महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल असेही पाटील म्हणाले.

Previous articleपंकजाताई पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार; विधानपरिषदेसाठी इच्छूक
Next articleउमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपल्या सोबत किती आमदार आहेत याचा विचार सर्वच पक्ष करतील