मुंबई नगरी टीम
मुंबई । माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आहेत.राज्यातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होत असून,त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लडविण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.मी विधानपरिदेवर जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे सांगून त्यांनी विधानपरिषदेसाठी दावा केला आहे.
राज्यातील विधानपरिषदेचे सदस्य सदाशिव खोत,सुजितसिंग ठाकूर,प्रवीण दरेकर,सुभाष देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर,संजय दौंड,विनायक मेटे, प्रसाद लाड,दिवाकर रावते यांचा कार्यकाळ येत्या ७ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे.त्यामुळे या रिक्त होणा-या जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे.सध्याचे संख्याबळ पाहता भाजपच्या चार तर महाविकास आघाडीच्या सहा जागा निवडून येवू शकतात.भाजपकडून उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात लॅाबिंगला सुरू झाली असतानाच आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेसाठी दावेदारी सांगितली आहे.पंकजा मुंडे यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.त्यानंतर त्यांची वर्णी केंद्रीय कार्यकारिणीत लागली आहे.विधानपरिषदेच्या निमित्ताने पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मी विधान परिषदेवर जावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र,पक्ष जो निर्णय गेईल तो मला मान्य आहे असे सूचक वक्तव्य करून त्यांनी पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.