पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण ? पण….राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची भावना !

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपाच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली एक वज्रमुठ बांधलेली असून,इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे.३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाईल.महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच चलो जावचा नारा दिला होता,मोदी सरकारलासुद्धा मुंबईतील बैठकीतूनच चले जावचा नारा दिला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला आगळेवेगळे महत्व आहे. एनडीएमधील काही पक्षही इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात.या बैठकीला नितिशकुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्यासह ६ मुख्यमंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खा.सोनिया गांधी,खा.राहुल गांधी हे उपस्थित असतील.इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत,भाजपाकडेच या पदासाठी उमेदवार नाही.नरेंद्र मोदींना जनता कंटाळली आहे, त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे.इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल पण काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची भावना आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्याबरोबर काही सहकारी भाजपाशी हातमिळवून सत्तेत सहभागी झाले ते ते ईडीच्या धाकाने, विकासासाठी नाही, हे शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. हेच लोक मागील अनेक वर्षांपासून सत्तेत होते मग त्यांनी काय विकास केला ते सांगावे असेही पटोले म्हणाले.मुंबई-गोवा महामार्गाचे काम जवळपास १७ वर्षांपासून सुरु आहे मात्र हा रस्ता पूर्ण होत नाही. या रस्त्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, भाजपाचे लोकच या रस्त्याच्या कंत्राटात भागिदार आहेत, कमीशनच्या वादातून हा रस्ता पूर्ण होत नाही. अनेक कंत्राटदार काम सोडून पळून गेले आणि त्याचा फटका मात्र कोकणच्या लोकांना बसत आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची चौकशी करावी म्हणजे, दूध का दूध, पाणी का पाणी होईल असे पटोले यांनी सांगितले.शासन आपल्या दारी अभियानावर जनतेच्या पैशाची लुट चालली आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील योजनाच हे सरकार राबवत आहे आणि त्याचे श्रेय मात्र स्वतः लाटत आहे. ज्याठीकाणी हा कार्यक्रम होतो, तिथली जनता सरकार बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करते, असेही पटोले म्हणाले.

Previous articleदेवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही ; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
Next articleराज्यात दुष्काळ जाहीर करा ; जयंत पाटील यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी