वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना २० लाखांची आर्थिक मदत

मुंबई नगरी टीम

मुंबई । वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणा-या अर्थसाय्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.यापूर्वी अशा घटनेत १५ लाखांची आर्थिक मदत करण्यात येत होती.आता ही रक्कम वाढविण्यात येवून २० लाख एवढी करण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.तसेच याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्‍याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातुन उत्‍तम पध्‍दतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्‍याने वन्यप्राण्यांच्या संख्‍येत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्टीने वनालगतच्‍या गावांमध्‍ये राहणा-या नागरिकांना वनविभागामार्फत प्रबोधन करण्‍यात येत असून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्‍थानिक जनतेचे वनावरील अवलंबीत्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये गेल्या तीन वर्षात २१३ जणांचा बळी गेला आहे. मनुष्‍यहानी झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या अवलंबित कुटूंबियांना वाघ,बिबटया,रानडुक्‍कर, गवा, अस्‍वल,लांडगा, कोल्‍हा, हत्‍ती व रानडुकरे यांच्‍या हल्‍ल्‍यात होणा-या मनुष्‍यहानीमुळे देण्‍यात येणा-या अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करण्‍यात आली असून यापुढे १५ लाखा ऐवजी २० लाख रूपये इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे.२० लखापैकी १० लाख संबंधित व्‍यक्‍तीला तात्‍काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्‍कम रूपये १० लाख त्‍यांच्‍या राष्‍ट्रीयकृत बॅंकेत असलेल्‍या दरमहा व्‍याज देणा-या संयुक्‍त खात्‍यामध्‍ये ठेव रक्‍कम जमा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. व्‍यक्‍ती कायम अपंग झाल्‍यास ५ लाख तर व्‍यक्‍ती गंभीररित्‍या जखमी झाल्‍यास १ लाख २५ हजार इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. व्‍यक्‍ती किरकोळ जखमी झाल्‍यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्‍यात येणार असून खाजगी रूग्‍णालयात औषधोपचार करणे अगत्‍याचे असल्‍यास त्‍याची मर्यादा २० हजार रूपये प्रती व्‍यक्‍ती इतकी राहणार आहे.

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैल यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणा-या ६० हजार इतक्‍या रकमेत वाढ करून ती ७० हजार इतकी करण्‍यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यु झाल्‍यास देण्‍यात येणा-या १० हजार इतक्‍या रकमेत वाढ करून १५ हजार इतकी वाढ करण्यात आली आहे. गाय, म्‍हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्‍व आल्‍यास देण्‍यात येणारी १२ हजार इतकी रक्‍कम वाढवून १५ हजार करण्‍यात आली आहे. तसेच गाय, म्‍हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्‍यास देण्‍यात येणारी ४ हजाराची रक्‍कम ५ हजार इतकी करण्‍यात आली आहे.

Previous articleआमदारांच्या धक्काबुक्कीनंतर सुप्रिया सुळेंनी केली भाजपच्या मोठ्या नेत्याकडे तक्रार..काय म्हणाल्या ?
Next articleपक्ष फोडणे व विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी भाजपाकडून ईडी,सीबीआय गैरवापर