थेट सरपंचपदांसह राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे : अहमदनगर-२०३,अकोला-२६६,अमरावती-२५७,औरंगाबाद-२१९,बीड-७०४,भंडारा-३६३,बुलडाणा-२७९ , चंद्रपूर- ५९, धुळे-१२८, गडचिरोली- २७, गोंदिया-३४८, हिंगोली- ६२, जळगाव- १४०, जालना-२६६, कोल्हापूर- ४७५, लातूर-३५१, नागपूर-२३७, नंदुरबार-१२३, उस्मानाबाद-१६६, पालघर- ६३, परभणी-१२८, पुणे-२२१, रायगड-२४०, रत्नागिरी-२२२, सांगली-४५२, सातारा- ३१९, सिंधुदुर्ग-३२५, सोलापूर-१८९, ठाणे-४२, वर्धा-११३, वाशीम-२८७, यवतमाळ- १००, नांदेड- १८१ व नाशिक-१९६ अशा एकूण- ७,७५१ ग्रामपंचायती

Previous articleराहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद
Next articleआमचे आमदार खोके घेऊन गायब झालेत; शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंकडे मांडली व्यथा