गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत

मुंबई नगरी टीम

मुंबई । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत प्राप्त केले आहे.गुजरातच्या या विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास अभिनंदन केले आहे.या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते असा टोला त्यांनी आपल्या खास शुभेच्छातून लगावला आहे.गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे,’ असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेचे निकाल आज जाहीर करण्यात आले गुजरात मध्ये भाजपचा तर हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाला.तर दिल्ली ‘मनपा’ निवडणुकीत ‘आप’ ने भाजपवर मात केली. याबद्दलही शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी काँग्रेस व आपचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.गुजरात विजयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,’गुजरातचा निकाल अपेक्षितच होता.गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले.त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते असा टोला त्यांनी शुभेच्छा देताना लगावला आहे.उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, ‘पंतप्रधान मोदी हे ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील ही अपेक्षा. आपने गुजरातेत मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे स्पष्टही झाले अशी टीका करतानाच ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते असेही म्हटले आहे.

Previous articleकर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे
Next articleउद्धव ठाकरे यांच्याकडे ब्रह्मास्त्रापेक्षा प्रभावी ‘टोमणेअस्त्र’ : देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल