ठाकरे सरकारने बंद केलेली योजना शिंदे फडणवीस सरकार पुन्हा सुरू करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू करण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राज्यात महाविकास आघाडी सरकारचे सरकार येताच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र आता शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या वर्षापासून याची सुरूवात होणार आहे.

राज्यात युतीचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील होतकरू तरूणांचा राज्याच्या प्रशासनाशी सुसंवाद वाढावा,विकासाच्या संकल्पना,अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता येईल यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू केला होता.त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.शिंदे फडणवीस सरकारने ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आज घेतला आहे.याची सुरूवात येत्या नव्या वर्षापासून करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम लवकरात लवकर कार्यान्वीत व्हावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात झालेल्या बैठकीत दिले.मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाबाबत आज येथे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस कृषी मंत्री अब्दुल सत्तार,उद्योग मंत्री उदय सामंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, राज्याचे मुख्य सचिव मनु कूमार श्रीवास्तव, वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

यापुर्वी हा कार्यक्रम २०१५ ते २०१९ दरम्यान राबविण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यापुर्वी हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे.यामध्ये हा कार्यक्रम पुन्हा सुरु करताना आणखी नवसंकल्पनांचा समावेश करण्यात यावा. हा कार्यक्रम लवकरात लवकर सुरु करण्याचे नियोजन करण्यात यावे. यामध्ये राज्यातील उच्चशिक्षण-संशोधनात कार्यरत संस्थांचाही सहभाग घेण्यात यावा. या योजनेमुळे उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तरूणांना नाविण्यपूर्ण संकल्पना घेऊन शासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कार्यक्रमात तरूण उत्साहाने सहभागी होतात. त्यांच्या उत्साहातून अनेक विकास संकल्पना गतीमान करता येतात. या योजनांमध्ये लोकाभिमुखता आणि आधुनिकता यांचा मेळ साधला जातो.

Previous articleराज्यात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता ; ५५ हजार रोजगार निर्मिती
Next articleमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत असतानाच विखे पिता पुत्रानी घेतली अमित शहा आणि जे.पी नड्डा यांची भेट