उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेतील पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची केली गोची

मुंबई नगरी टीम

नागपूर । जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश केंद्रशासित करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.आता त्यांनी पहिल्यांदाच विधान परिषदेत ही मागणी लावून धरली.उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेच्या कामकाजात भाग घेत कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरील चर्चेत भाग घेतला. यवेळी त्यांनी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करण्याची मागणी केली.

उद्धव ठाकरे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार,भाजप आणि केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला. विधानपरिषदेच्या कामकाजात पहिल्यांदाच भाग घेताना उद्धव ठाकरे हे सीमावादावर तब्बल १५ ते २० मिनिटे बोलले. यावेळी त्यांनी सीमावादाच्या लढ्याची माहिती देतानाच या प्रश्नावर सरकारने कठोर आणि कणखर भूमिका घेण्याची मागणी केली. तसेच सभागृहात सीमावाद्यावरील लढ्याचे पुस्तक आणि एक माहितीपटाची फिल्मही दिली.केंद्र सरकारकडे सीमावादाचा प्रश्न सोडवण्याची हिंमत आहे का ? कर्नाटकाचे मुख्यमंत्री जोरात बोलत आहेत.आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी काढला आहे का ? ठराव मांडणार आहात. हा ठराव काय असेल ? त्याचे काय शब्दांकन केले ? असा सवाल करतानाच, सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा प्रश्न प्रलंबित असेपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित झालाच पाहिजे,असा ठराव केलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

ठराव करायचा असेल तर हाच ठराव करावा.जोपर्यंत या विषयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो प्रदेश केंद्रशासित केलाच पाहिजे. चर्चा करायचीच असेल तर धाडसाने केली पाहिजे. मुख्यमंत्री येतील न येतील. त्यांना दिल्लीतून सोडले जाईल की नाही माहीत नाही. पण आपण हा ठराव आजच्या आजच केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.सीमाप्रश्न ही जबाबदारी आहे कुणाची आहे ? केंद्र सरकार पालक म्हणून पालकासारखे वागतंय का ? सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यानंतरही कर्नाटक सरकार ज्या आग्रहीपणे त्यांची भूमिका मांडतंय तशी भूमिका आपले सरकार मांडतंय का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.आम्ही काय केले ? तुम्ही काय केले ? हे ठेवा बाजूला. आपण काय करणार आहोत ? हा आजचा प्रश्न आहे. शिवसेनेने एक ठराव केला होता. १९६९ साली सीमावादावरून आंदोलन पेटले होते. मी त्या आंदोलनात नव्हतो. तेव्हा मी माझ्या आईसह उपस्थित होतो. बाबरी पाडायला गेलो असे काही लोक सांगतात, तसे सीमा आंदोलनात होतो असे सांगणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

मोरारजी देसाई मुंबईत येणार होते. सीमावासियांकडून माहीम नाक्यावर त्यांना निवेदन देण्यात येणार होते. प्रत्यक्षात काय घडले ? मोरारजी देसाई यांची गाडी निघून गेली. त्यांनी इतरांना उडवले. एक छायाचित्रकार जखमी झाला. एका शिवसैनिकाच्या पोटावरून गाडीचे चाक गेले. त्यामुळे जनता खवळली.तुफान लाठीमार झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे शिवसेनाप्रमुखांना अटक झाली. तीन महिने शिवसेनाप्रमुख आत होते. मनोहर जोशी, दत्ताजी साळवी त्यांच्यासोबत येवरड्याच्या तुरुंगात होते. अनेक शिवसैनिकांची धरपकड झाली. दहा दिवस मुंबई जळत होती. मुंबई शांत होत नव्हती. शिवसेनाप्रमुखांनी तुरुंगातून आवाहन केलं. त्यानंतर मुंबई शांत झाली, अशी आठवण त्यांनी सांगितली.जन्म घ्यावा तर महाराष्ट्रात घ्यावा, असे कधी महाराष्ट्रात येऊन कर्नाटकाचा मंत्री बोलताना पाहिला का ? जन्म घ्यावा तर कर्नाटकात असे महाराष्ट्राचे मंत्री म्हणतात. चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकात जाऊन तसे उद्गार काढले.अशा राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार ? ते कसा प्रश्न सोडवणार ?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

Previous articleसीमाप्रश्नावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सरकारवर घणाघाती टीका….काय म्हणाले चव्हाण ?
Next articleमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मान खाली घालायला लावेल,अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही