नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ? उद्या होणार फैसला

मुंबई नगरी टीम

मुंबई । नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ.सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी या ठिकाणी बंडखोरी केल्याने त्यांच्यावर पक्षाने कारवाई केल्याने या मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी संपर्क साधला असून,नाशिक मतदार संघासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज बुधवारी महाविकास आघाडीच्या होणा-या बैठकीत होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना त्यांनी अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघात पेच निर्माण झाला आहे.आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद शिक्षक मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला.त्यानुसार येथून विक्रम काळे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर नाशिक पदवीधर मतदार संघ हा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने काँग्रेसने येथून डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अधिकृत उमेदवारी जाहीर करूनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांनी अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतात असेही अजित पवार म्हणाले.तीन वेळा आमदार असल्याने या जागा वाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. आताही ते सतत दुरध्वनीव्दारे संपर्कात आहेत.मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण लागली होती आणि याची कल्पना काँग्रेसच्या वरीष्ठांना दिली होती असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

या गोंधळामुळे भाजपला संधी मिळाली असल्याचे त्यांचे नेते बोलत आहेत मात्र त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही.याबाबत महाविकास आघाडीचे नेत्यांनी एकत्रित बसून योग्य तो मार्ग काढला होता मात्र अर्ज न भरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.हा काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता त्याचा मी साक्षीदार आहे असे सांगतानाच त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय नव्हता हे मी मान्य करणार नाही असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत त्यामुळे त्यांनी तेथून महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त निधी आणावा व आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे कारण काही लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारे प्रकल्प बाहेर जाऊ देणे आणि काही लाख तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले हे घडलेले हे त्रिवार सत्य असल्याचे अजित पवार यांनी सांगून,४५ हजार कोटींचा करार होणे आणि प्रत्यक्षात गुंतवणूक होणे हे पहावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी गुंतवणूक येणार असेल तर आम्हाला आनंद आहे आणि त्याचे स्वागतच करु असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.

हिंदी राष्ट्रभाषेविषयी देशपातळीवर चर्चा झाली होती.आपण बोलत असताना जागतिक भाषा म्हणून इंग्रजीचा तर राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी आणि मातृभाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख करतो. पण मराठी इंग्रजीबद्दल दूमत असण्याचे कारण नाही. या दोन्ही भाषा मोठ्याप्रमाणावर बोलल्या जातात. मात्र राष्ट्रभाषेबद्दल तशाप्रकारे केंद्रसरकारने हिंदी राष्ट्रभाषा जाहीर केलेली नाही.केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांची याबाबत वेगळी भूमिका आहे. परंतु महाराष्ट्राचा नागरीक या नात्याने विचारले तर हिंदी राष्ट्रभाषा करायला हरकत नाही तसा केंद्रसरकारने प्रयत्न करावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली.आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपातील रस्ता गैरप्रकारांबाबत ज्या बर्‍याच गोष्टी सांगितल्या त्यात शंभर टक्के तथ्य आहे. मुंबईवर प्रशासक आहे. प्रशासक व नगरविकास खात्याची वस्तुस्थिती काय आहे याचे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. यावर आयुक्त आणि त्यांच्या टीमचे काय म्हणणे आहे हे राज्याला व मुंबईकरांना कळले पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

यावेळी पवार यांनी आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या रस्ता गैरप्रकारांबाबतही भाष्य केले. पत्रकारांनीही खोलात जाऊन याची माहिती घ्यावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले. मुंबईत रस्त्यांची जी कामे सुरू आहेत त्यामध्ये परकिलोमीटर काय खर्च येतो हे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे आणि मलाही त्याबद्दल माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी जो परकिलोमीटर १७ कोटी रुपये खर्च येतो हे सांगितले परंतु एवढा परकिलोमीटर खर्च येत नाही. मुंबई हे शहर सात बेटांवर वसलेले आहे. यामध्ये सर्व्हिस देणार्‍या ४० प्रकारच्या बाबी आहेत. त्या जमिनीखालून चालतात त्यामुळे ताबडतोब कामे होऊ शकणार नाहीत त्याला काही काळ लागणार आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसताना एवढ्या हजार कोटींची कामे काढण्याची घाई का? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

मुंबई मनपाचा अर्थसंकल्प मागच्यावर्षी झाला मग अर्थसंकल्प झाला असताना इतके कोटी रुपये कुठून आणणार आहात. कट कुठे लावला हे कळायला मार्ग नाही.सरकारमध्ये आले आहेत म्हणून घिसाडघाईने सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रीट करणार हे ऐकायला कानाला फार बरं वाटतं त्यात माध्यमाला सांगायला पण चांगलं वाटतं परंतु ते खरंच शक्य आहे का ? असा सवाल पवार यांनी केला.एकंदरीत भौगोलिक परिस्थिती बघता त्याची अंमलबजावणी होऊ शकते का ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारने आत्मचिंतन व आत्मपरीक्षण केले पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.प्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही. शरद पवार यांनी खुल्या मतदार संगातून प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना निवडून आणण्याचे काम केले होते.त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आठवले यांच्यासोबत युती राहिली होती. पंढरपूरमधून आठवले यांना निवडून आणले होते.प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्या पक्षाच्या वरीष्ठांवर अशाप्रकारची वक्तव्य करत असतात तो त्यांचा अधिकार आहे परंतु आम्ही कुणाशीही तसे वागत नाही हे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleपदवीधर,शिक्षक निवडणूक : कुठं बंडखोरी तर काही ठिकाणी अपक्षांमुळे अधिकृत उमेदवारांची डोकंदुखी वाढली
Next articleदावोस मध्ये महाराष्ट्राचा डंका ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार कोट्यवधींची गुंतवणूक