एकात्मिक तिकिट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्चपासून सुरू करा
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशासाठी तयार करण्यात येत असेलल्या एकात्मिक तिकीट प्रणालीच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. यावेळी या प्रणालीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम १ मार्चपासून सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुंबई महानगर प्रदेशातील सर्व सार्वजनिक वाहतूक यंत्रणांसाठी एकच तिकिट व्यवस्थापन प्रणाली असावी. जेणेकरून प्रवाशांना मुंबईतील कुठल्याही सार्वजनिक वाहतूक साधनातून प्रवास करता येईल व वेळ वाचेल, यासाठी एकात्मिक तिकिट प्रणाली तयार करण्यात येत आहे. या प्रणालीचे सादरीकरण आज मुख्यमंत्री फडणवीस यांना वर्षा या शासकीय निवासस्थानी देण्यात आले.बेस्ट, रेल्वे, मोनो व मेट्रो, मुंबई तसेच आसपासच्या प्रदेशातील ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई येथील परिवहन सेवांसाठी एकच तिकिट प्रणाली असणार आहे. ही तिकिट प्रणाली अकाउंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठुनही रिचार्ज करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सार्वजनिक वाहतुकीस चालना मिळणार आहे. या प्रणालीच्या कार्यचालनासाठी विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल व रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नवीन मेट्रो लाईन, इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा समावेश होणार असून याबरोबरच नंतर वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रवाशांची सोयीसाठी ही तिकिट प्रणाली उपयुक्त असून यामुळे वेळ व पैसा वाचणार आहे. या प्रणालीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. तसेच फक्त मुंबई महानगरा पुरतेच स्मार्ट कार्ड न ठेवता राज्यातील कुठल्याही शहरात सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वापरता येण्याजोगी व्यवस्था करावी.