भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी भुजबळांना तुरूंगातुन बाहेर काढले
राज ठाकरे यांचा आरोप
अंबरनाथ : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी तुरूंगातुन बाहेर काढले असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.भुजबळ यांना उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीनानंतर राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भाजपलाही एक्स्पायरी डेट आहे असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. भुजबळ यांना उशीरा जामीन मिळाला तो सरकारमुळे, भाजपाच्या फायद्यासाठी भुजबळांना जामीन मिळाला असेल तर जनतेला ते कळेलच असे सांगतानाच हे राजकारण योग्य नाही असे राज ठाकरे म्हणाले. भुजबळांच्या जामीनावर भाजपा राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.अंबरनाथमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. भुजबळांवर असलेल्या आरोपांची चौकशी होईल, त्यामध्ये ते दोषी आढळले, तर त्यांना शिक्षाही होईल. मात्र थ्यांना जामीन मिळण्यासाठी जो उशीर झाला, त्याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.