मुंबई नगरी टीम
संजय निरूपम यांचा भाजपला टोला
मुंबई : येणारी लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या युद्धासारखी असेल, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत म्हटले होते. त्यावर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी खोचक ट्विट केले आहे. पानिपतचे युद्ध हे पराभवासाठी ओळखले जाते, हे विसरू नका, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
आगामी लोकसभा निवडणूक ही पानिपतसारखीच असून सव्वाशे कोटी लोकांची ही निर्णीयक लढाई आहे, असे अमित शहा म्हणाले होते. निरूपम ट्विटमध्ये म्हणतात की, पानिपतचे युद्ध हे पराभवासाठी ओळखले जाते. भाजपला पराभवाची चिंता सतावत आहे का, असा टोला निरूपम यांनी लगावला आहे. कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सध्या आरोप आणि प्रत्यारोपांचे युद्ध सुरू आहे. निवडणुका जवळ येताना हे वाक्युद्ध जास्तच भडकले आहे. संजय निरूपम यांचे खोचक ट्विट यातलाच प्रकार आहे. आता भाजपकडून कॉंग्रेसच्या या टोल्याला कसे प्रत्युत्तर दिले जाते, याची उत्सुकता आहे.