शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई नगरी टीम
मुंबई : गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना जनाची नाही तरी मनाची लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही, असा टोला पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया ही नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दूसरा पर्याय नाही असेही शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.