दहावी आणि बारावीचा निकाल या तारखेला लागणार !

मुंबई नगरी टीम

सोलापूर : प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या आसपास लागणारे दहावी आणि बारावीचे निकाल या वर्षी राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुढे गेला आहे.राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेण्यात येवून दहावीच्या ४० ते ४५ टक्के तर बारावीच्या ६५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असल्याने यंदा दहावीचा निकाल २० ते ३० जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल ५ ते १४ जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीच्या परीक्षेच्या अंतिम पेपरच्या कालावधीत राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला मात्र राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक शास्त्र पेपर-२ म्हणजेच भूगोल या विषयाचे गुण हे विद्यार्थ्याने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून,त्याचे रुपांतर परीक्षा रद्द करण्यात आलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये किती गुण मिळतात त्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन भूगोलच्या पेपरला गुण दिले जाणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर  इतर कोणताही शेरा नसेल, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते.१५ जूनपासून शाळा सुरु करता येतील का, प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी विशेषकरून ग्रामीण भागातील शाळा मोकळ्या मैदानात दोन-तीन सत्रात भरवणे शक्य आहे का, यावर आज बैठक आयोजित करण्यात आली होती. शाळा कधीपासून सुरु होतील हे सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १४ मेपासून उत्तरपत्रिका तपासणीला आला वेग आला असून,आतापर्यंत बारावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची पैकी सुमारे ६० टक्के तर दहावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची पैकी ४० टक्के उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य भागांमध्ये संसर्ग वाढत असल्याने त्या ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे.त्यामुळे बारावीचा निकाल सर्वप्रथम १४ जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल ३० जुलैपर्यंत जाहीर होईल असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून अकरावीची प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल; काही फेऱ्या कमी करून ऑगस्टअखेर प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.जून महिन्यातील कोरोनाची स्थिती पाहून दुपारी किव्हा सकाळच्या सत्रात बारावीचे वर्ग १५ जूनपासून सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे. आगामी वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी पूर्ण व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर १ ते १५ सप्टेंबर दरम्यान या विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू करण्याचेही नियोजन आहे.

Previous articleशाळांमध्ये वीज आणि संगणकाचा पत्ता नाही,मग ऑनलाईन शिक्षण कसे देणार ?
Next articleफडणवीसांनी ठाकरे सरकारची स्तुती करीत “ही” टीका केली