निवडणूक आयोगाकडून भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर ? : चव्हाणांचा गंभीर आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई : सहा महिन्यापूर्वी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणूकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडिया वरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणे अपेक्षित आहे.परंतु सदर प्रकार लोकशाहीमधील मुलभूत तत्त्वांना धक्का पोहचवणारा असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या नावाने पेज सुरु केले होते.या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. सदर पेज तयार करताना वापरकर्त्याने पुढील पत्ता दिला होता. “२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई”. हा पत्ता कोणाचा आहे याबाबत शोध घेतला असता फडणवीस सरकारने सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम साईनपोस्ट इंडिया नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते.त्या साईन पोस्ट कंपनीचा असल्याचे निष्पन्न झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. हाच पत्ता सोशल सेंट्रल नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारे देखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार त्याची कंपनी द फियरलेस इंडियन, सपोर्ट नरेंद्र मोदीं इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याचे समोर येते. ही पेजेस भाजपाचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केले असल्याचे त्याच्या वेबसाईटवरून समोर येते असेही चव्हाण यानी यावेळी सांगितले.

घटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु वरील घटनेवरून असे निदर्शनास येत आहे की महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे.या घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी चव्हाण यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

Previous articleसरकार पाडून दाखवा; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान
Next articleएसटी महामंडळातील ५० पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती