मुंबई नगरी टीम
पुणे । काँग्रेसने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही उलट त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.एकीकडे काँग्रेसने सत्यजीत तांबेंवर कारवाईचे संकेत दिले असतानाच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क सत्यजीत तांबे यांचे तोंडभरून कौतुक केले.सत्यजीत तांबे यांनी युवा नेता म्हणून चांगले काम केले असे सांगतानाच राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे करावे लागतात. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेवू असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला येवूनही भाजपने उमेदवार दिला नसल्याने ही पुर्वनियोजित राजकीय खेळी तर नव्हती ना अशी चर्चा राजकिय वर्तुळात आहे. पाठिंब्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे काल सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले असतानाच आज एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांचे कौतुक केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.सत्यजीत तांबे यांनी युवा नेता म्हणून चांगले काम केले आहे.मात्र राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे करावे लागतात.नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचा योग्य वेळी निर्णय घेतला जाईल,असे फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात भाजपकडून राजेंद्र विखे यांना उमेदवारी देण्याचा विचार होता.याबाबत राजेंद्र विखे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर चर्चा सुरू होती.मात्र काही कारणास्तव राजेंद्र विखे यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली,असेही फडणवीस या वेळी म्हणाले.पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांवरही भाष्य केले.पंकजा मुंडे या नाराज नसून त्या भाजप सोडणार नाहीत. भाजप हेच त्यांचे घर आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.