रस्त्याच्या कामाच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप ! कंत्राटदारांना ४८ टक्क्यांचा फायदा

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.महाराष्ट्रात आलेले खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे.मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत म्हणत माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी ताकीद दिली.

आदित्य ठाकरे यांनी रस्त्याच्या कामाच्या कंत्राटावरून गंभीर आरोप केलेत. खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. पाच हजार रस्त्यांचे कोटींच्या निविदा ही धुळफेक आहे. ४५० किमीसाठी ६०८४ कोटींच्या निविदा आहेत, फेब्रुवारीत काम सुरु केले तरी काम कधी होणार ? असा सवाल त्यांनी केला. मुंबईत कामे करण्याचा करण्याचा कालावधी हा १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असतो कारण बाकीच्या कालावधीत पाऊस पडतो.पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामे पावसाळ्याच्या आधी पूर्ण केली जातात मात्र आत्ता हाती घेतलेली काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण होतील का ? याचा अभ्यास केला गेलेला नाही. तसेच या सगळ्या गोष्टी घडत असताना ४८ टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला आहे.महापालिकेत कोणतीही समिती नसताना महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांनी ही कामे मंजूर कशी केली हा प्रश्न मुख्य आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,जी निविदांची खिरापत वाटण्यात आली आहे त्या निविदेचा पैसा मुंबईकरांच्या खिशातला आहे. कामाची समज नसतानाही निविदा काढण्यात आल्या असाही आरोप त्यांनी केला. मुंबईतल्या निविदा या या इतर राज्यांमधल्या निविदापेक्षा वेगळ्या असतात. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले जात आहेत.मग गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री आहेत ते मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ठाण्यातले रस्ते काँक्रिटचे का केले गेले नाहीत ? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला. मार्च २०२२ च्या २ हजार कोटींच्या कामाला ३ वर्ष लागणार हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितले. मग या सहा हजार कोटींच्या कामाला किती वर्ष लागणार ? असा सवाल उपस्थित करीत या निविदा रद्द करून पुन्हा काढा अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून मोगलाई असल्याची स्थिती आहे.गणेशोत्सवात गोळीबार करणाऱ्या आमदारांवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.गद्दार आमदारांकडून कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात अनेक घटना घडल्या आहेत. शिवीगाळ, धमक्या देणे, दादागिरी अशा घटना घडत आहेत.मात्र कारवाई झालेली नाही.स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके या धोरणावर सरकार चालले आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Previous articleसत्यजीत तांबेंचे देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक ! फडणवीस म्हणाले योग्य वेळी निर्णय घेवू
Next articleमुंबईचा जोशीमठ झाला तर कोण जबाबदार ? आदित्य ठाकरेंचा ‘शिंदे सरकार’ला रोखठोक सवाल