मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या आज मुंबईत बैठक पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली.
सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या आज झालेल्या बैठकीत आरक्षणासंदर्भात सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात आरक्षणाबाबत योग्य निर्णय न झाल्यास येत्या १ ऑगस्टला जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावर सध्या उद्रेक झाला आसतानाच नुकत्याच मुंबई बंद नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची मुंबईत बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत या संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मराठा समाजाच्या विरोधामुळेच आषाढी एकादशीला होणारी विठ्ठलाची शासकीय महापूजा टाळल्याचे आणि वारी दरम्यान गर्दीत साप सोडून घातपात घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती यंत्रणांनी दिली असल्याचे मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे मराठा समाजाच्या भावना दुखवणारे असल्याने त्यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणीआजच्या बैठकीत करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई बंदच्या दरम्यान झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर दुपारीच बंद स्थगित करण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणीही आज झालेल्या बैठकीत करण्यात आली.










