कायद्यात आहे ते आचरणात आणण्यासाठी धर्म जागृत व्हावा लागतो : सरसंघचालक

कायद्यात आहे ते आचरणात आणण्यासाठी धर्म जागृत व्हावा लागतो : सरसंघचालक

मुंबई :  “समाजासाठी कायदे केले जातात पण, जे कायद्यात आहे ते आचरणात आणायचे असेल तर त्यासाठी धर्म जागृत व्हावा लागतो. समाज धर्माने चालतो. धर्म म्हणजे पूजा नव्हे, तर माणुसकी म्हणजे धर्म! माणुसकीचा धर्म कसा आचरावा हे दाखवणारा हा सोहळा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्यक्ष या धर्माचा अनुभव आज आपण घेतला आहे. हा धर्म आपणही प्रत्यक्ष आचरणात आणला पाहिजे. आपापल्या कुवतीनुसार हे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे. धन, श्रम, कल्पना, योजना अशा विविध मार्गांनी हे कार्य आपण करू शकतो, आणि ते केलेच पाहिजे. सबबी देण्याचा पर्याय या विशेष मंडळींनी ठेवलेला नाही.” असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज काढले.

नूतन गुळगुळे फौंडेशनच्या वतीने दिव्यांगांच्या विशेष कर्तृत्वाचा सन्मान करणारा सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ. मोहन भागवत रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर तसेच नूतन गुळगुळे, पुष्कर गुळगुळे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील कर्तबगार दिव्यांग व्यक्तींना तसेच दिव्यांगांच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा “ध्येयपूर्ती पुरस्कार – २०१८” आज प्रदान करण्यात आला. आपला दिव्यांग मुलगा पुष्कर गुळगुळे याला मोठे करताना आलेल्या अडचणींवर मात करून, नूतन व विनायक गुळगुळे दाम्पत्याने या संस्थेची व पुरस्कारांची सुरुवात केली आहे. आज या पुरस्कार सोहळ्यात कृषी, उद्योगविश्व, वैद्यकीय, विधी अशा विविध क्षेत्रातील दिव्यांगजनांना गौरविण्यात आले. तसेच मायलेक, दिव्यांग कुटुंब, मरणोत्तर ध्येयपूर्ती, विविध संस्था यांचाही सन्मान करण्यात आला.

सरसंघचालक पुढे म्हणाले, “आज आपल्याला धर्माचे दर्शन घडले आहे. धर्म सर्वांना जोडतो, उन्नत करतो. कुठेही अमंगलता येऊ न देता मंगल सुखाचा आपल्यावर वर्षाव करतो. नुकताच मी राजकोटला साधू-सत्पुरुषांच्या मेळाव्याला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर माझ्या मनात जे भाव उत्पन्न झाले, तेच भाव आज येथेदेखील मी अनुभवत आहे. माझ्यासमोर बसलेल्या मंडळींनी त्यांच्या अडचणींचा बाऊ न करता स्वतःचे जीवन उन्नत केले आहे. सोबतच माणुसकीचा धर्म निभावताना समाजातील अन्य अभावग्रस्तांच्या उन्नतीसाठीदेखील प्रयत्न केले आहेत.  “तमसो मा ज्योतिर्गमय” ही प्रार्थना या दिव्यांग मंडळीनी सार्थ केली आहे.”

Previous articleनेतृत्वाने अपयशाची जबाबदारीही घेतली पाहिजे : गडकरी
Next articleबीड-परळीतून मुंडे बहिणींना कुणाचा बापही हरवू शकत नाही : जानकर