खंडाळ्यातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : खंडाळा तालुक्यातुन आलेल्या  एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या अर्धनग्र मोर्चाला अखेर न्याय मिळणार आहे.हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही, तसेच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील  जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येईल, लेखी आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

सातारा जिल्ह्यातील विविध गावातील शेतक-यांच्या जमिनी अनेक प्रकल्पांमध्ये गेल्या आहेत. परंतु या शेतक-यांना पर्यायी जमिनी देण्यात आल्या नसल्याच्या कारणास्तव या भागातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी खंडाळा तहसिलदार कार्यालयापासून अर्धनग्न मोर्चा काढला होता. गेल्या आठ दिवसापासून खंडाळ्यातुन निघालेला मोर्चा काल मुंबईत धडकला मात्र त्यांना मानखुर्द येथे अडवण्यात येवून या मोर्चाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पाचारण केले होते. त्यानुसार आज प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्र्यांशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.

 खंडाळा टप्पा क्रमांक १ मधील शिल्लक राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १५ टक्के परताव्याची जमीन खंडाळ टप्पा-२ मध्ये देण्यात येईल. तर खंडाळा टप्पा-२ मधील हरकत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार नाहीत.  बागायतीखालील  जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी देण्यात येतील. खंडाळा टप्पा-३ मधील ज्या जमिनी लाभक्षेत्राखालील आहेत, त्या जमिनी वगळण्यात येतील व या टप्प्यामधील ज्या जमिनी महामंडळाच्या ताब्यात आहेत, त्या  जमिनीला संलग्नता असलेले क्षेत्र संमतीने घेण्यात येईल असे देसाई यांनी सांगितले.खंडाळा औद्योगिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत ३ हजार ९२६ रोजगारापैकी २ हजार ४८९ रोजगार स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आलेले आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे अधिक स्थानिक लोकांना रोजगार देण्यात येतील.  जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनासाठी झालेल्या  विलंबाबाबत उद्योगमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.या विलंबाबाबत संबधित अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची चौकशी करण्याची महसूलमंत्र्यांना विनंती करण्यात येईल असेही ते म्हणाले.

 खंडाळा एमआयडीसीतील जमिनी  संदर्भात अनेक प्रलंबित  मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. आज उद्योगमंत्र्यांच्या भेटीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी येत्या आठ दिवसात मागण्यापूर्ण न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात प्रमोद जाधव, सतीश कचदे, रवींद्र ढमाळ, आनंद ढमाळ, युवराज ढमाळ, दत्तात्रय हाके यांचा समावेश होता. यावेळी उद्योग विभागाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी आबा मिसाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे, कोल्हापूर प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, वाईच्या उप विभागीय अधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले उपस्थित होते.

Previous article“चुन चुनके”…… धनंजय मुंडेंचा  सत्ताधा-यांना ‘शोले` स्टाईल इशारा
Next articleमुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी बैठका बिनकामाच्या : धनंजय मुंडे