कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेनेच्याच
मुंबई नगरी टीम
मुंबई : येथील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्याच असून त्या बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,असे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.आमच्या जागा बदलणारी ही मंडळी कोण,असा सवाल करत त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागा,असे सांगितले.कोल्हापूर मतदारसंघात संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांची नावे निश्चित झाल्याचे समजते.
मुंबईत किरीट सोमय्यांना शिवसैनिकांचा तीव्र विरोध आहे. त्यांची जागा शिवसेनेने घ्यावी आणि त्या बदल्यात कोल्हापूरची जागा भाजपला देण्यात यावी,असे प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी सुरू केले होते. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला महत्त्व आहे.भाजपकडे कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरी जागा असावी,असा पाटील यांनी प्रयत्न सुरू केले होते. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या चालींना सुरूंग लावला आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना आपल्याकडे घेऊन त्यांना भाजपकडून जिंकून आणायचा पाटील यांचा हेतू होता.पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.मुंबईत मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. हेवेदावे न ठेवता कामाला लागा.शिवसेनेचा खासदार निवडून आणा,असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा ग्रामीण भागात जोर आहे. युती झाल्यावर आता शिवसेनेच्या ताकदीचा उपयोग होईल, म्हणून पाटील यांनी असे प्रयत्न सुरू केले होते. पण अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही. त्यामुळे जागांची अदलाबदली होऊ शकते. भाजप शिवसेनेत आता युती झाल्यावर वातावरण गोड असले तरीही धुसफूस चालू आहेत.