…अन्यथा राजू शेट्टी १५ जागी उमेदवार उभे करणार
मुंबई नगरी टीम
पुणे : राजू शेट्टी आघाडीने फक्त एक जागा देऊ केल्याने चांगलेच नाराज झाले आहेत.आघाडीकडून कोणत्याही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नसल्याचा त्यांनी आरोप केला असून आघाडीने तीन जागा सोडण्याची त्यांनी मागणी केली आहे.अन्यथा राज्यात १५ ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणूका लढवेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेससमोरील पेच आणखी वाढला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी तीन जागा सोडाव्यात.यामध्ये बुलडाणा येथील राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा तर वर्धा या काँग्रेस कोट्यातील जागेचा समावेश आहे. हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच आही. जी जागा आमचीच आहे,ती देण्याचा प्रश्नच नाही.मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टींविरोधात निवडणू लढण्याची तयारी केली आहे.त्यावर शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बाजूने लढताना अनेक वेळा मी आंदोलने केली.शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवतो,म्हणून मोदी, फडणवीस यांच्यासह अनेक सत्ताधारी माझ्यावर नाराज आहेत. माझ्यासमोर कुणीही निवडणूक लढवली तरी हरकत नाही, मी हातकंणगले मतदारसंघातून पुन्हा निवडून येईन,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.वर्धा,बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठ आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वर्धा मतदारसंघातून माजी मंत्री सुबोध मोहिते तर बुलडाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही उद्यापर्यंत अल्टीमेटम देत आहोत, असेही त्यांनी सांगितले. राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १५ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी आहे,असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. आघाडीला हा दुसरा धक्का बसला आहे. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत चर्चेचे सर्व पर्याय संपले असल्याचे जाहीर करून एक धक्का दिला आहे. आता राजू शेट्टी खरोखरच स्वतंत्र निवडणूक लढवतात की दबावतंत्राचा भाग आहे, हे पहावे लागेल.मात्र आघाडीच्या नेत्यांची झोप उडवणा-या घटना घडत आहेत.