जाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा कार्यक्रम

जाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा कार्यक्रम

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेचा सुसज्ज रथ मंगळवारी मुंबईत भारतीय जनता पार्टी, प्रदेश कार्यालयातून प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केला.

 प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यापूर्वी यात्रांसाठी वापरलेल्या रथांचा वापर  मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी करण्यात येत आहे. शिवराजसिंह चौहान यांनी सात वर्षे मध्य प्रदेशात जनसंपर्कासाठी हा रथ वापरला होता. त्याची दुरुस्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी वापरण्यात येणार आहे.

महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत  तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून  १ ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून  सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून या भागातील एकुण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघातून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे.   यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत  सभा होणार आहेत. याशिवाय एकुण २३८ पेक्षा अधिक  गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल.

Previous articleमुख्यमंत्र्यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या देणार
Next articleमाजी राज्यपाल राम नाईक यांचा भाजपामध्ये प्रवेश