भाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा 

भाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा 

मुंबई नगरी टीम

जुन्नर :  राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ आज अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थानी मातीने भरलेला मंगल कलश हाती घेत झाला . नवस्वराज्य आणायचं, अशी शपथ घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या महायात्रेला सुरुवात केली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमि असलेल्या शिवनेरी किल्ल्याची पवित्र माती कपाळाला लावून शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभीच हे दळभद्री सरकार उलथून टाकून, रयतेचे राज्य आणण्याचा निश्चय केला.

जुन्नर येथील पहिल्या सभेत बोलतांना भाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा आहे असा टोला विधान परिषदे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावत त्यांनी मुख्यमंत्र्याच्या यात्रेला महाधनादेश यात्रा म्हणत हिणवले. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठीची आहे अशी टीका त्यांनी केली. शिवस्वराज्य यात्रा जनतेच्या हितासाठी असल्याची ग्वाही त्यांनी केली.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांचा या सरकारने वेळोवेळी अपमान केला आहे. छत्रपतींच्या स्मारकाची एक वीटही अद्याप रचलेली नाही. त्यांच्या नावाने जाहीर केलेली कर्जमाफीही फसवी निघाली. त्यामुळे जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.

इतिहासात छत्रपतींच्या घराण्यात फुट पाडण्याचे काम अनाजी पंतांनी केले याची नोंद आहे. आजही महाराष्ट्रात आधुनिक अनाजी आहेत असे म्हणत त्यांनी भाजपाच्या पक्ष फोडाफोडीच्या कृतीला फटकारले. बहात्तर हजार नोकऱ्यांसाठी मेगाभरती करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? अहो तुम्ही तर आपल्या पक्षातच मेगा भरती सुरू केली आहे. भाजपामुळे राजकारणात गुन्हेगारीकरण वाढत चालल्याची दुर्दैवी चित्र समोर येत असल्याची टीकाही त्यांनी केली. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभच आता बोलू लागलाय की भाजप म्हणजे काशीचा घाट झाला आहे. कितीही पापी माणूस तिथे गेला तरी शुद्ध होतो अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.

खोटं बोला पण रेटून बोला हा मुख्यमंत्र्याचा उद्योग सुरू आहे. म्हणे ५० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. मात्र आर्थिक अहवालात तर मुख्यमंत्र्यांचं हे ‘सत्य कुठेच नाही. मुख्यमंत्री साहेब, किती खोटं बोलवं याचे भान राखण्याची तंबी त्यांनी दिली.माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, फोजिया खान, आ. विद्या चव्हाण, रुपाली ताई चाकणकर , शेख महेबुब आदी उपस्थित होते.

Previous articleपुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार ? अजित पवार
Next articleपाच वर्षे कामे केली असती तर यात्रा काढावी लागली नसती