मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे सरकार अल्पमतात असल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर आता त्यांनी पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे.ठाकरे यांनी आजही शिवसेना भवनात पदाधिका-यांशी गाठीभेटी घेतल्या.महिला आघाडीतल्या प्रमुख महिला नेत्यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी आपण पुन्हा शिवसेना भवनात जायला सुरुवात करणार असून शिवसैनिकांना भेटणार आहे. शिवसेनेची नवीन वाटचाल सुरु करणार आहे असे म्हटले होते.राजीनामा दिल्याच्या दुस-या दिवसापासून ठाकरे हे शिवसेना भवनात येवून शिवसैनिक आणि पदाधिका-यांशी संवाद साधत पक्षबांधणीवर लक्ष देत आहेत.आज त्यांनी सेनाभवनात महिला आघाडीतील प्रमुख महिला नेत्यांची बैठक घेवून पक्षबांधणीबाबत मार्गदर्शन केले.या बैठकीत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला.काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती त्याला ब्रेक नव्हता सुसाट सुटला होता,शिंदेंचे भाषण सुरू असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते अपघात तर होणार नाही.कालच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचला पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.