राहुल गांधींची १३ तारखेला चांदिवलीत भव्य प्रचारसभा

राहुल गांधींची १३ तारखेला चांदिवलीत भव्य प्रचारसभा

मुंबई नगरी टीम

मुंबई : चांदिवली मतदारसंघातून काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नसीम खान यांनी प्रचाराचा धडका लावला असून, रविवारी १३ तारखेला राहुल गांधी यांची भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. लोकमान्य टिळकनगर, ९० फूट रोड, साकिनाका येथे संध्याकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. राहुल गांधी यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचा घोटाळा, आरेमधील झाडांची कत्तल, बेरोजगारी तसेच युती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर राहुल गांधी तोफ डागतील, अशी माहिती काँग्रेस उमेदवार नसीम खान यांनी दिली.

राहुल गांधी यांच्या सभेसाठी चांदिवली मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. राहुल गांधी यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे तसेच प्रेरणा देणारे असते. जागतिक किर्तीचे शहर म्हणून ज्या मुंबई शहराचा लौकीक होता त्याला भाजप-शिवसेनेच्या सरकारने काळीमा फासला असून मुंबईची वाटचाल बकाल शहराकडे झालेली आहे. विकासात  मुंबईसह महाराष्ट्राची अधोगती झालेली आहे, आपल्यापेक्षा इतर राज्यांनी विकासामध्ये आघाडी घेतली असून युती सरकारचा नियोजनशून्य कारभार यासाठी कारणीभूत आहे. या सर्व मुद्द्यांना राहुल गांधी भाषणात हात घालतील असेही नसीम खान म्हणाले.

प्रचाराचा धडाका लावलेल्या नसीम खान यांनी शुक्रवारी अँथोनी चाळ, कैलाशपुरम वाचनालय, उदयनगर मच्छी मार्केट, साकीनामा येथे चौकसभा घेतल्या. मुंबई शहरासाठी मेट्रो ही काँग्रेस आघाडी सरकारने आणलेली आहे. या शहराच्या विकासासाठी काँग्रेस सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही परंतु विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचीही काळजी घेतली होती. युती सरकारसारखे रातोरात्र हजारो झाडांची कत्तल केली नाही, असा टोला नसीम खान यांनी लगावला. भाजप शिवसेना सरकार गोरगरिब, सामान्य जनतेच्या हिताचे नाही म्हणूनच हे सरकार घालवण्याची आता वेळ आलेली आहे, असेही नसीम खान म्हणाले.

Previous articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
Next articleशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक ही चूकच!