हेरगिरी थांबवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे राज्यपालांना साकडे

हेरगिरी थांबवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे राज्यपालांना साकडे

मुंबई नगरी टीम

मुंबई : ‘फेसबुक’ मालकीच्या ‘व्हॉटस्अॅप’ या मेसेंजिंग अॅपच्या माध्यमातून देशातील पत्रकार, मानवी हक्क चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात सुरु असलेली हेरगिरी निषेधार्ह, संतापजनक असल्याचे सांगून अशी हेरगिरी बंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करुन संबंधीत प्रकारातील दोषींना कठोर शासन करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात राज्यपाल महोदयांना पत्र लिहिले असून, त्या पत्रात मुंडे म्हणतात की, ‘व्हॉटस्अॅप’च्या माध्यमातून देशातील जनतेच्या, पत्रकारांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून त्यातील फोटो, व्हिडीओ, ऑडीओ संवादासारखी वैयक्तिक, खाजगी स्वरुपाची सगळीच माहिती काढून घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या काळात 20 एप्रिल ते 10 मे या कालावधीत एका विशिष्ट संस्थेने मोठ्या प्रमाणात माहितीची हेरगिरी केल्याचे व त्याबद्दल  अमेरिकेतील  एका  न्यायालयात  खटला  दाखल  झाल्याचे  वृत्त  एका  आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केल्याकडे  मुंडे यांनी राज्यपालाचे लक्ष वेधले आहे.व्हॉटस्अॅप’च्या हेरगिरीमागे शासकीय व्यवस्थेतील संस्थांचा सहभाग असण्याची शक्यताही  मुंडे यांनी व्यक्त केली.  देशातील शासकीय यंत्रणांनी यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये अशा पद्धतीने नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात घुसखोरी, हेरगिरी केल्याचे वारंवार समोर आले आहे. हे निषेधार्ह, संतापजनक आहे, असेही  मुंडे म्हणाले.

देशातील नागरिकांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडणे, त्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात डोकावणे व तेथून त्यांच्या व्यक्तिगत, खाजगी, संवेदनशील माहितीची चोरी करणे हा गंभीर अपराध आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात डोकावण्याचा प्रकार गंभीर असून यातून प्रचंड जनक्षोभ उसळण्याची भीती नाकारता येत नाही, अशी भीतीही मुंडे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

Previous articleमित्र पक्षांना चार मंत्रीपदे द्या : रामदास आठवले
Next articleशरद पवार धनंजय मुंडे करणार पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी