मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केले पंकजाताई मुंडेंचे कौतुक

मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर पंकजाताई मुंडे यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेतली असून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न ऐरणीवर आणल्याबद्दल त्यांनी पंकजाताई मुंडे यांचे कौतुकही केले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची एक सविस्तर मुलाखत सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी मराठवाड्याचा पाणीप्रश्न महत्त्वाचा आहे. काय करणार त्याचं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता,यावर भाष्य करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मराठवाड्याच्या बैठकांमध्ये हा पाण्याचा प्रश्न नक्कीच समोर आला आहे. खूपच मोठा प्रश्न आहे. मराठवाडा हा गेली काही वर्षे सतत दुष्काळात आहे,’ पाण्याचं दुर्भिक्ष्य प्रचंड आहे. मध्ये तर लातूरला ट्रेनने पाणी द्यावे लागले होतं. तर त्यासाठी पाण्याचे जे काही प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत. म्हणून मी पंकजाला एक पत्र लिहिलं आहे की, तू हा जो मुद्दा काढला आहेस, ऐरणीवर आणला आहेस,धन्यवाद! पण त्याबद्दल सरकार संवेदनशील तर आहेच; पण हा प्रश्न पंकजाने मांडण्याच्या आधीच मी मार्गी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या महिन्यात २७ जानेवारीला मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर पंकजाताई मुंडे यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं होतं.या उपोषणाला मराठवाड्यातील सर्व जिल्हयातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, याशिवाय अनेक सामाजिक संघटनांनी सुध्दा यात सक्रीय सहभाग नोंदवला होता. हे उपोषण सकारात्मक होते, मुख्यमंत्री ठाकरे याची दखल घेऊन मार्ग काढतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार या उपोषणाची मुख्यमंत्र्यांनी दखल तर घेतलीच शिवाय पाणी प्रश्न ऐरणीवर आणल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांचे कौतुकही केले.

Previous articleनागरिकत्व सुधारणा कायदा कोणात्याही धर्मीयांच्या विरोधात नाही
Next articleयेत्या महाराष्ट्र दिनापर्यंत महाराष्ट्र सिंगल यूज प्लास्टिकमुक्त