नागरिकत्व सुधारणा कायदा कोणात्याही धर्मीयांच्या विरोधात नाही

मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय नागरिकत्व सुधारणा हा कायदा देशातील कुठल्याही नागरिकाच्या नागरिकत्वावर घाला घालणारा नाही, या कायद्यात केवळ सुधारणा करण्यात आलेल्या आहेत,बांग्लादेश, अफगाणिस्तान व पाकिस्तान या तीन मुस्लिम देशांमध्ये जे धार्मिक अल्पसंख्यांक आहेत, जे अल्पसंख्याक त्या देशात विस्थापित असून पन्नास ते साठ वर्षे याच देशात राहतात त्यांना नागरिकत्व देण्याचा हा प्रमुख विषय असून हा कायदा कुठल्याही धर्मीयांच्या विरोधात नसल्याचे ठाम प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केले.
भारतीय नागरिकत्व सुधारणा या कायद्याच्या समर्थनार्थ तलासरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने भव्य मोर्चा वतीने काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. आमदार पास्कल धानेरो यांच्या सह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यामध्ये मुस्लिम बांधव व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थितांना कायद्यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. या कायद्यातील विरोधाभास व या कायदयावर असलेले चुकीचे आक्षेप याचीही माहिती दिली.
एन.आर.सी म्हणजे देशात राहणाऱ्या नागरिकत्वाची नोंदणी करणे इतकाच आहे, दर १० वर्षांनी जनगणना करण्यात येते. देशाच्या सर्वोच्चा न्यायालयाच्या आदेशानुसार, दिलेल्या निर्देशानुसार आणि ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेमध्ये कोण भारतीय व कोण परदेशी हे ठरविण्याची प्रक्रिया आहे, असे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की, समाजातील काही विघातक शक्ती समाजाला या मुद्द्यावरुन विनाकारण खतपाणी घालून समाजाला भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत.पण त्यांना बळी न पडण्याचे आवाहन दरेकर यांनी केले.
मुस्लिम समाज आणि आदिवासी समाजाला भडकविण्याचा काम काही मंडळी करत आहेत पण, आदिवासी समाजाची जास्ती जास्त काळजी देशात मोदी सरकारने आणि राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. पालघरमध्ये देखील आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ५३ हजार कोटी रुपयांची तरतूद आदिवासींसाठी करण्यात आली आहे.यामुळे आदिवासींची काळजी घेणारे केंद्र सरकार आहे, कुणीही कितीही प्रयत्न केला तरी त्यामुळे कोणाच्याही भडकिवण्याच्या कट कारस्थानाला बळी पडू नये असे आवाहन दरेकर यांनी केले.सीएए आणि एनआरसी कायदा नक्की काय आहे तसेच या कायद्यावरील आक्षेपांची तपशीलवार माहिती दरेकर यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना दिली. तुमच्या मनात असणाऱ्या शंका किंवा संभ्रम विषयी आपल्याशी चर्चा करा,या कायद्यासंदर्भातील आक्षेपांवर मन मोकळे करा असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केली.

Previous articleसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार : उदय सामंत
Next articleमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केले पंकजाताई मुंडेंचे कौतुक