नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा;भाजपाची राज्यपालांकडे मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले आहे.नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास सूचना द्यावी अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.उद्या बुधवारपर्यंत पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी भाजपच्यावतीने देण्यात आला आहे.

मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देवू शकतो असे वक्तव्य केल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडा-यातील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपचे नेते आक्रमक झाले आहे. पटोले यांच्या या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी आज भाजपच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले.पटोले यांच्या अटकेसाठी भाजपने अनेक पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.तर पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज राजभवन येथे जाऊन भेट घेतली.त्यावेळी लोढा यांनी सांगितले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले असून मुंबई भाजपा यांचा तीव्र निषेध करत आहे.मोदी देशातील जनतेच्या श्रध्दास्थानी आहेत. परंतु देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेस समर्थकांच्या मानात एवढा द्वेष आहे की, देशाचे पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. हे पंजाब घटनेवरून सिध्द झाले असून ही बाब अत्यंत दुर्देवी आहे.पटोले यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे मंगल लोढा यांनी सांगितले.

या शिष्टमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, उत्तर पूर्व मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष अशोक राय, मुंबई भाजपा प्रवक्ता निरंजन शेट्टी उपस्थित होते.

Previous articleठाकरे सरकारच्या काळात महाराजांच्या गडकिल्ल्यांचे हिरवेकरण करण्याचा प्रयत्न
Next articleभायखळा आग्रीपाड्यात ‘उर्दू भवन’ उभारण्याचा शिवसेनेचा डाव