विद्यार्थ्यांनो…आता घरी बसूनच अभ्यासक्रम पूर्ण करा !

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात टाळेबंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलाचा पेपरही पुढे ढकलण्यात आला आहे तर पहिले ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता मुल्यमापनाच्या करून त्यांना पुढील प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.शालेय विद्यार्थ्यांचे या पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लर्न फ्रॉम होम म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल,या पर्यायांची पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहे.

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यातील सर्वच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने अगोदरच घेतला आहे.दहावीचा शेवटचा होणारा भूगोलाचा पेपरही पुढे ढकलण्यात आला आहे.कालच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षांसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागातील राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लर्न फ्रॉम होम म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्यास मंत्री गायकवाड यांनी अधिका-यांना सूचना केल्या.विद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासाठी टी.व्ही., रेडिओच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे.त्यासाठी दैनंदिन शिक्षण आराखडा तयार करावा.शैक्षणिक कामासाठी तयार करण्यात आलेले ई मटेरियल बालभारती व एससीईआरटी यांनी एकत्रितपणे द्यावे.सर्व अधिकारी यांनी वेळेत काम करावे, अशा सूचनाही  त्यांनी यावेळी दिल्या.

अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा यांनी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना कशा प्रकारे  ऑनलाईन शिक्षण देता येईल,याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.दीक्षा ॲप, स्मार्ट फोनद्वारे पालक, अधिकारी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थी व शिक्षकांसाठी आराखडा दिल्याचे, त्याचप्रमाणे इयत्ता निहाय पालक,शिक्षकांचे व्हॉटसॲप ग्रुप तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.विनाअनुदानित शाळांना टप्याटप्याने देण्यात येणाऱ्या अनुदानबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती कार्यवाही  करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.यावेळी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ‘ऑनलाईन अधिकारी व्यावसायिक विकास मंचचे’ उद्घाटन गायकवाड यांनी केले.

Previous articleराज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच झाली “कॅबिनेट”
Next articleमारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची चौकशी करा