१ लाख ६ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचविले

मुंबई नगरी टीम

मुंबई:  एसटीच्या ” लालपरी ” ने गेल्या सहा दिवसांत राज्याच्या विविध भागातील तब्बल १ लाख ६ हजार २४ श्रमिक – मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचविण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. त्यासाठी एसटीच्या हजारो बहाद्दर चालकांनी अहोरात्र मेहनत करून ७ हजार २२७ बसेसद्वारे ही बहूमोल कामगिरी करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

गेली ७२ वर्ष राज्याच्या सर्व सामान्य जनतेला सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा  देणाऱ्या एसटीने वेळोवेळी आपले सामाजिक भान जपत ,संकटात राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध घटकांना मदतीचा हात पुढे केला आहे. आज करोना महामारीच्या जागतिक संकटाला सामोरे जात असताना राज्य शासनाच्या निर्देशानुसार २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यानां दळणवळणाची सेवा एसटी मार्फत पुरविण्यात येत आहेत.त्याचबरोबर ९ मे पासून एसटीच्या बसेस आपल्या गावी जाण्याच्या ओढीने भर उन्हा-तान्हात कुटुंबासमवेत पायपीट करणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप सोडण्यासाठी धावत आहेत.गेल्या सहा दिवसांत राज्याच्या विविध भागातील तब्बल १ लाख ६ हजार २४ श्रमिक – मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचविण्याच्या कार्यामुळे ” महाराष्ट्राची लोकवाहिनी ” ही बिरुदावली अभिमानाने मिरवणारी आपली लाडकी ” एसटी ” देशपातळीवर देखील गौरवास पात्र ठरली आहे.

Previous articleकेंद्राचे पॅकेज म्हणजे जुन्या घोषणा, नियमित उपाययोजना आणि आश्वासनांची पुरचुंडी
Next articleराज्यात आज कोरोनाचे १६०२ नवीन रुग्ण; ४४ रुग्णांचा मृत्यू