उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश ; रत्नागिरीत होणार वैद्यकीय महाविद्यालय

मुंबई नगरी टीम

रत्नागिरी : रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून,सामंत यांच्या मागणीनुसार रत्नागिरी येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे त्याचा प्रस्ताव करा असे आदेश मुख्यमंत्री यांनी देवून रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली.रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विषाणू प्रयोग शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १ कोटी ७ लाख रुपये खर्चाने विषाणू प्रयोग शाळा उभारण्यात आली आहे,याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून  केले.विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे.या पुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल.याचा जिल्हयातील सर्वांना फायदा होणार आहे असे सांगून,रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करणारे रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचीही मागणी मान्य करीत आता रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी देवून रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली आहे.सामंत यांच्या पुढाकारने अनेक दिवसांचे रत्नागिरीकरांचे स्वप्न होणार आहे.ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे.माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि आज मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करीत आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्हयांमध्ये अशा स्वरुपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजूरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर अवघ्या १४ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या यंत्रे व उपकरणे यासाठी ८० लाखांहून अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी १५ लाखांचा खर्च झाला.अतिशय गतिमान पध्दतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे यावेळी अभिनंदन केले.

लॉकडाऊन सुरु झाला त्याचा उपयोग आरोग्य सुविधांची वाढ करण्यासाठी करावा हे धोरण ठेवून राज्यात काम सुरु आहे असे सांगून ते म्हणाले की कोव्हीड-१९ चे संकट सुरु झाले त्यावेळी राज्यात केवळ २ प्रयोगशाळा होत्या आता ही संख्या ८५ झाली आहे.संकटाचे रुपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत.नागारिकांना तपासणीसाठी फार दूर जावे लागणार नाही यासाठी सुविधा निर्माण करताना त्या तपासणीचे दर देखील त्यांच्या आवाक्यात आणणे हे यापुढील काम सरकारचे असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.या ठिकाणी प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने कोव्हीड नंतर विषाणूने होणाऱ्या एच.आय.व्ही, जनेटिक ओळख आदि सोबत कर्करोगाच्या चाचण्या देखील शक्य होणार आहेत. यासाठी ही सुविधा सर्वांना उपलब्ध राहील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. जालना आणि रत्नागिरीला एकाच दिवशी मंजूरी प्राप्त झाली आणि रत्नागिरीची प्रयोगशाळा विक्रमी वेळेत सुरु झाली याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधानसचिव प्रदीप व्यास मुंबईतून तर सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शेखर निकम आणि प्रसाद लाड हे रत्नागिरीतून व आमदार भास्कर जाधव चिपळूणमधून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Previous articleविधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेवर संधी देवू नका
Next articleसरकार तुमच्यासोबत आहे; शरद पवारांचा कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा