राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुदानात वाढ; मंत्री उदय सामंत यांच्या मागणीला यश

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मिळणारे अनुदान हे अतिशय तुटपुंजे असल्याने या मध्ये वाढ करण्याची मागणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्राकडे केली होती.मंत्री सामंत यांच्या मागणीला यश आले असून,केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना अतिशय तुटपुंजे अनुदान मिळत होते. ही बाब जेव्हा राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना अनुदानात वाढ करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. उच्च शिक्षण विभागाने केंद्राच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाकडे वारंवार पाठ पुरावा केला. केंद्र सरकारने केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशभरातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाना ही वाढ केली आहे.त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मानधन वाढवून देण्याची मागणी करणारे पहिले राज्य आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना नियमित कार्यक्रमासाठी पूर्वी २५० रुपये अनुदान मिळत होते,नव्या वाढीमुळे आता ४०० रुपये मिळणार आहे. तर विशेष कार्यक्रमासाठी पूर्वी ४५० रुपये मिळत होते,ते आत्ता ७०० रुपये मिळणार आहे.राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला सर्वसामान्य, वंचित, होतकरू मंत्री लाभले आहेत. त्यांच्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे मत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केले आहे.

Previous articleबीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलवा;पंकजा मुंडेंची गृहमंत्र्यांकडे मागणी
Next articleमराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य ; संभाजीराजे छत्रपतींचे उपोषण मागे