मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग ऑनलाईन सुरू असून आता ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्यात कोविड-१९ चा प्रादूर्भाव कमी होत असल्याने महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.