मुंबई नगरी टीम
लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटूंबाने शेतीशी असलेली नाळ कायम ठेवली आहे.येणाऱ्या पिढीस शेतीची संस्कृती हि समजून यावी यासाठी विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी आवर्जून सहकुटुंब शेतात हजेरी लावत धीरज यांनी शेतीची कामे केली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत माजी केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांचा आपल्या गावावर विशेष लक्ष होते.राज्याचा कारभार सांभाळत असतानाही वेळात वेळ काठीत ते आपल्या शेतावर जावून आपल्या काळ्या आईची सेवा करीत. त्यांच्याच हा वारसा त्यांचे चिरंजीव आणि लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी जपला आहे.राज्यात कोरोनाचे संकट आहे.त्याच टाळेबंदी लागू असल्याने आपल्या लातूर ग्रामीण या मतदार संघातील जनतेची काळजी घेण्यासाठी धीरज देशमुख यांचा बाभळगाव येथे मुक्काम आहे. मतदार संघातील जनतेची काळजी घेत असतानाच त्यांचे बाभळगाव येथील शेतावर ही लक्ष आहे.काल त्यांनी सहकुटूंब आपल्या शेतात जावून आमदार धीरज यांनी स्वत: शेतीची कामे केली.त्यांनी याची माहिती आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे.
सध्या पाऊस अपेक्षेप्रमाणे पडत असल्याने सर्वत्र पेरणीस गती आली आहे. बाभळगाव येथील आमच्या शेतात पाळी घालून सोयाबीनची पेरणी केली.पावसाची वाटचाल समाधानकारक असून खरीप हंगामाकडून खूप मोठ्या आशा आहेत.ऊस, सोयाबीन व अन्य पीक हे उत्तमरीत्या येऊन त्या माध्यमातून अपेक्षीत उत्पन्नाची सर्वानाच आशा आहे.आमच्या कुटुंबाची शेतीशी असलेली नाळ हि कायम असून येणाऱ्या पिढीस शेतीची संस्कृती हि समजून यावी यासाठी आवर्जून सहकुटुंब मी शेतात आलो होतो. आदरणीय आईनी स्वतः शेतीत लक्ष देऊन विविध प्रयोग केले आहे. शेडनेट मधील भाजी असेल अथवा सेंद्रिय उसाची लागवड या बाबतीत आई नेहमी प्रयत्नशील असतात.शेती विषयीची आवड माझ्या मनात निर्माण करण्यात आईंचा मोठा वाटा आहे. शेती विषयीची हीच आवड माझ्या मुलांमध्ये रुजावी हा माझा प्रयत्न आहे.असे आमदार धीरज देशमुख यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.