रेशनच्या तांदळाच्या काळाबाजाराची सीआयडी मार्फत चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्न, धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेऊन कारवाई देखील करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील मौजे सोनेगाव स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहाराबाबत तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर ४१० कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यातील एकही नागरिक अन्न, धान्यांपासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. तसेच या काळामध्ये अन्न,धान्याचा काळाबाजर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलीसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील २४ टन भरलेला तांदळाचा ट्रक पकडला होता. या तांदळाच्या अवैध विक्री व्यवहाराची तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर ४१० कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला आहे. या तांदळाच्या काळाबाजार व अवैध विक्री व्यवहाराची चौकशी सी.आय.डी. मार्फत करण्यात येणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील गैर व्यवहारांना आळा बसणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.

Previous article१ ऑगस्टपासून आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू होणार; दिड लाखाहून अधिक प्रवेशक्षमता
Next articleवाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान