भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. परंतु ही निव्वळ खोटी अफवा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे भाजपचेच आमदार राष्ट्रवादीत यायल इच्छुक आहेत, असा मोठा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

यावर नवाब मलिक यांनी म्हटलं की, “विरोधकांकडून आमचे आमदार जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत. परंतु यावर कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र यावर लवकरच निर्णय होऊन माहिती दिली जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मेगाभरती झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु ही मेगाभरती होऊनही भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही. तर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. अशातच आता भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा घरवापसी करणार असल्याचा मोठा दावा नवाब मलिक यांनी केल्याने या चर्चा आता आणखी रंगणार आहेत.

 

Previous articleमोठा दिलासा : दिवसभरात १३ हजार ३४८ रुग्ण झाले कोरोनामुक्त
Next articleमुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी “या” व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण होणार