धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; रेणू शर्मांनी बलात्काराची तक्रार मागे घेतली

मुंबई नगरी टीम

मुंबई : रेणू शर्मा या महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या तक्रारी नंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते.या प्रकरणी धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले होते.मात्र आज धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणा-या महिलेने त्यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे.कौटुंबिक कारणे आणि या प्रकरणाचे राजकारण होत असल्याने आपण तक्रार घेत असल्याचे या महिलेने म्हटले आहे.

रेणू शर्मा यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री घनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या तक्रारी नंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते.रेणू शर्मा या महिलेने समाज माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता.या महिलेने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या महिलेच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत या प्रकरणावर खुलासा केला होता त्यांच्या या खुलाशामुळे राज्यातील राजकारणात भूकंप घडला होता.आपले करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत संबंध होते आणि या संबंधातून दोन मुले असल्याचा खुलासा मुंडे यांनी करून रेणू शर्मा यांची तक्रार ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला होता.

मुंडे यांच्यावर झालेल्या या आरोपांनंतर राज्यात खळबळ उडाली होती.या प्रकरणी विरोधी पक्ष भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.भाजपच्या महिला मोर्चाने सोमवारी त्यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनीही या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून चौकशीनंतर कारवाई करण्याचे संकेत देत, पोलिसांच्या तपासात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध काही सिद्ध झाले तरच पक्ष योग्य तो निर्णय घेईल.तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही,असे सांगत त्यांना दिलासा दिला होता.काल या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे.कौटुंबिक कारणे आणि या प्रकरणाचे राजकारण होत असल्याने मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करु नये अशी विनंती या महिलेने पोलिसांकडे केली आहे. आहे. मात्र या महिलेने तक्रार मागे घेतल्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी या महिलेबाबत खळबळजनक दावा केला होता.मनसेचे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्याने देखील या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा केला होता. कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. दरम्यान खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.अशा प्रकारामुळे ज्या महिला खरंच पीडित आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो.तसेच या प्रकरणात सरकारी यंत्रणाचा बराच वेळ गेला.अशा प्रकारच्या आरोपांमुळे एखाद्याचे वैयक्तिक आयुष्यासह राजकीय जीवनही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नसल्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

Previous articleविरोधकांना संयमाची लस टोचण्याची गरज – मुख्यमंत्री
Next articleराज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या ते धनंजय मुंडे प्रकरणावर काय म्हणाले शरद पवार