मुंबई नगरी टीम
मुंबई । रणरागिणी होऊन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी दिवसरात्र तैनात राहून ड्युटी फर्स्टचा आदर्श पाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सलाम केला आहे.
छत्रपती शिवरायांच्या काळात 'हिरकणी' गवळण आपल्या तान्हुल्यासाठी रायगडावरील कठीण कडा उतरली होती. आजच्या समाजातही कर्तव्य बजावून मातृत्व जपणारी 'हिरकणी' बघितल्यावर अभिमानाने उर भरून येतो! चंदीगडमध्ये बाळाला कडेवर घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या या पोलीस महिलेला माझा त्रिवार सलाम! pic.twitter.com/Bcp7Kx0HzN
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 7, 2021
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पत्र पाठविले आहे.यामध्ये देशमुख यांनी म्हटले आहे की,ऊन वारा,पाऊस, दिवस, रात्र…एवढंच कशाला कोरोनाच्या विषाणूपुढंही तुम्ही नमत नाही. रणचंडिका, दुर्गा वैभवसंपन्नलक्ष्मी,विद्यावती सरस्वती या रुपात आणि लेकाची माय, बापाची लेक,भावाची बहिण,संसारातली अर्धांगिनी या नात्यात महिला कार्य करतात. प्रेम, वात्सल्य, आपुलकी, स्नेह, लळा, जिव्हाळा, मायेचा सागर,सेवा, क्षमा, कर्तव्य, कारुण्य, त्यागाची मूर्ती आहेत. त्यामुळेच पृथ्वी शेषाच्या फण्याने नव्हे तर तुम्ही साऱ्याजणींनी पेलली आहे. ‘वर्दी’तल्या माता-भगिनींबद्दल तर आणखी आदर वाटतो असे कौतुक करताना देशमुख म्हणतात, तुमच्यातली आई, पत्नी, बहिण, मुलगी ही सारी नाती घरी ठेवून तुम्ही ‘ड्युटी फर्स्ट’ म्हणत वर्दी चढवता. रणरागिणी होऊन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी दिवसरात्र तैनात होता.ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र…एवढंच कशाला कोरोनाच्या विषाणूपुढंही तुम्ही नमत नाही. म्हणूनच वर्षातून एकदाच हा दिवस साजरा का करावा ? महिला दिन रोज साजरा करायला हवा.