आता माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘या’ योजनेची होणार चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष योजनेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली.ही समिती येत्या चार महिन्याच्या आत वृक्ष लागवड योजनेची चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही भरणे यांनी सांगितले.त्यामुळे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील वृक्ष लागवडीच्या योजनेची चौकशी सरकार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन फडणवीस सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबविली होती.त्यावर किती खर्च झाला व यातील किती झाडांचे संगोपन झाले यासंदर्भात शिवसेनेचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.या मोहिमेअंतर्गत वन विभागाने २८ कोटी वृक्षांची लागवड केली. त्यातील सध्या ७५ टक्के रोपे जिवंत असून २५ टक्के रोपे नष्ट झाल्याचे सरकारने मान्य केले होते. राज्यातील अनेक भागातील वृक्ष नष्ट झाली असून,जी झाडे आहेत त्याची व्यवस्थित देखभाल व संगोपन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.वृक्ष लागवड योजनेवर २५०० कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कोरगावकर यांनी केली होती.या वृक्ष लागवड योजनेची चौकशी विधिमंडळाच्या समितीमार्फत करण्याची घोषणा वन राज्यमंत्री भरणे यांनी सबागृहात केली होती.तर चार किंवा सहा महिन्यात याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिली होती. त्यानुसार, आता केवळ आठच दिवसात मंत्री भरणे यांनी विधीमंडळ सदस्यांची समिती स्थापन करून ही समिती चार महिन्याच्या आत सभागृहाला अहवाल सादर करेल,अशी घोषणा केल्याने माजी वनमंत्री मुनगंटीवार यांची योजना चौकशीच्या फे-यात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली १६ विधानसभा सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मंत्री भरणे यांच्यासह नाना पटोले (काँग्रेस), सुनील प्रभू (शिवसेना), उदयसिंग राजपूत (शिवसेना), बालाजी किणीवर (शिवसेना), अशोक पवार (राष्ट्रवादी) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी), सुनील भुसारा (राष्ट्रवादी), शेखर निकम (राष्ट्रवादी), सुभाष धोटे (काँग्रेस), अमित झनक (काँग्रेस), संग्राम थोपटे (काँग्रेस), आशिष शेलार (भाजप), नितेश राणे (भाजप), अतुल भातखळकर (भाजप), समीर कुणावर (भाजप) आणि नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) आदी १६ विधानसभा सदस्यांचा समावेश आहे.

Previous articleपोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन नाही तर केवळ उचलबांगडी
Next articleदेवेंद्रजी.. ठाकरे सरकार सत्तेवर आले ही तुमचीच चूक ! मुनगंटीवार यांनी सुनावले