पंढरपूरमध्ये महाविकास आघाडी सरकारवरील संताप व्यक्त :चंद्रकांत पाटील

मुंबई नगरी टीम

पुणे । राज्यातील जनता शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागली असून या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर,मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाला,अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केली.त्यांना भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि मतदारांचे आभार मानले.

पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे, विजेची कनेक्शन कापणे, वेगवेगळी नुकसानभरपाई खात्यात जमा नाही, शेतकऱ्यांना मदत नाही, पीकविम्याचा लाभ नाही, कोविडच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना पॅकेज नाही, जे तुटपुंजे पॅकेज दिले त्याची अंमलबजावणी नाही, अशा अनेक प्रश्नांनी लोक हैराण झाले आहेत. लोक निवडणुकीची वाट पाहत होते. ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट झाली.लोकांच्या मनात आघाडी सरकारबद्दल राग आहे. संधी मिळेल तेथे लोक तो व्यक्त करतात. ग्रामपंचायत निवडणुकीतही साडेचौदा हजार पैकी सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपाला विजय मिळाला. महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत, हे या पोटनिवडणुकीतील जनतेच्या कौलावरून दिसून आले आहे.असे पाटील यांनी सांगितले.आ. प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांनी एकदिलाने भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना साथ दिली, त्यामुळे विजय मिळण्यास हातभार लागला. या विजयाबद्दल आपण परिचारक यांचेही अभिनंदन करतो, असे त्यांनी नमूद केले.

पंढरपूर,मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय हा पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचा विजय आहे. पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन त्यांना जबाबदारी दिल्याप्रमाणे कामगिरी केली. संघटित शक्तीतून हा विजय मिळाला. दहा मतदारांच्या गटाची जबाबदारी एकेका कार्यकर्त्याला इतके सूक्ष्म नियोजन या निवडणुकीत केले होते, त्याचा परिणाम झाला. पंढरपूरच्या विजयाने बरेच काही शिकायला मिळाले, असे पाटील म्हणाले.आसाममध्ये भाजपा सत्ता राखत आहे. पाँडेचरीमध्ये भाजपा आघाडी सत्तेवर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला गेल्या वेळच्या तीन जागांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात जागा यावेळी मिळत आहेत. देशामध्ये भारतीय जनता पार्टी हा अत्यंत प्रबळ पक्ष म्हणून पुढे आला आहे व त्याच्या विरोधात इतर सर्वांना एकत्र यावे लागते हे या निवडणुकीत पुन्हा स्पष्ट झाले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व डाव्यांनी निवडणुकीतून जवळजवळ माघार घेतली. भाजपाच्या विरोधात काहीजण उघडपणे एकत्र लढतात तर काहीवेळा उघडपणे एकटा लढतो आणि पाठीमागून बाकीचे लढतात. पश्चिम बंगालमध्ये दुसरा प्रकार दिसला. तेथे भाजपाविरोधात छुपेपणाने सगळे एकत्र आले व धृविकरण झाले असेही त्यांनी सांगितले.

Previous articleहा तर रडीचा डाव! शरद पवार भाजपवर संतापले !
Next article“आपल्या सर्वांचा जीव महत्वाचा”…जयंत पाटलांनी केले भावनिक आवाहन