मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोना संकटातही पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत ऐतिहासिक विजय मिळवत विजयाची हॅटट्रिक केली आहे.मात्र या निकालावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लक्ष करीत संताप व्यक्त केला आहे.
रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर दुसरीकडे आपली संपूर्ण शक्ती पणाला लावलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे.पंतप्रधान मोदी गृहमंत्री शहा यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ बंगालमध्ये प्रचारासाठी उतरूनही भाजपाला शंभरी पूर्ण करता आली नाही.बंगाल मध्ये अधिकृत निकालाची घोषणा झालेली मसली तरी ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे.या ऐतिहासिक विजयाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. तर काही वेळापूर्वी शरद पवार यांनी एक ट्विट करीत भाजपला लक्ष केले आहे.बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केले. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! असे ट्विट करीत पवार यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनतेने पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्ता देत विश्वास व्यक्त केला आहे.