दहावीचा निकाल जून अखेरीस;अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पास करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी ( सामाईक प्रवेश परीक्षा ) घेण्यात येईल,ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.मंडळामार्फत जून अखेरीस दहावीचा निकाल घोषित करण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे सदर धोरण तयार करताना विभागातील तज्ञ, मुख्याध्यापक,शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आली. सर्व घटकांशी सखोल चर्चा करून दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक आव्हाने आली आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षा मध्ये वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन,ऑफलाईन अध्यापन घेण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने दहावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी, पालक,परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळाकडून दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना निश्चित केली आहे असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

त्यानुसार दहावी परीक्षेच्या अंतिम निकालाचे निकष ठरविण्यात आले आहे.विद्यार्थ्यांचे १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनासाठी ३० गुण,गृहपाठ,तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण दिले जाणार आहेत.नववीच्या विद्यार्थ्यांचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण ( इ. ९ वी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इ. १० वी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश हे मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोरोनापूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (इ. ९ वीचा) निकाल कोरोनापूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद असणार आहे.ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांना बसण्याची संधी उपलब्ध असेल.

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती गठीत करण्यात आली असून,या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे. असेही गायकवाड यांनी सांगितले.मंडळामार्फत जून अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन असून, त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.बाहेरून दहावीची परीक्षा देणारे आणि रिपीटर आणि तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे.श्रेणीसुधार योजने अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील.राज्यातील दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार धोरण तयार करताना केला असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या दहावीच्या निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी घेण्यात येणार आहे.ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व ऑप्टिकल मार्क रिकग्निशन पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.अकरावी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल असेही गायकवाड यांनी सांगितले.

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यातील दारूची दुकाने पुन्हा सुरू होणार;चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली
Next articleचक्रीवादळग्रस्त कोकणाला केलेली मदत तुटपुंजी,दरेकरांचा उपोषणाचा इशारा