दिलासा : अॅग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी,पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाचा लाभ राज्यातील ३८ शासकीय,१५१ विनाअनुदानित अशा एकुण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे.ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सुट देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या अधिनस्त शासकीय व अशासकीय सर्व महाविद्यालयांचे सर्व पदवी,पदव्युत्तर व आचार्य या अभ्यासक्रमाचे विविध शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत आज कुलगुरूंची बैठक झाली.विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परिक्षेचा अर्ज करण्यास अडवु नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी यावेळी दिले.

अनुदानित महाविद्यालये व कृषी विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील विद्यार्थी मदत निधी, विद्यार्थी सुरक्षा विमा शुल्क, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुल्क, महाविद्यालय नियतकालिक, अश्वमेध,क्रीडा महोत्सव शुल्क, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शुल्क, ओळखपत्र, विद्यार्थी सहायता, मदत, कल्याण निधी, स्नेहसंमेलन, गुण पत्रिका शुल्क, नोंदणी शुल्क, अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आलेला नाही, त्याबाबीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १०० टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला.जिमखाना, खेळ व इतर उपक्रम आणि ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सुट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून वसतिगृहचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्का पोटी आकरण्यात येणाऱ्या शुल्कात पुर्ण पणे सुट देण्यात आली आहे.कायम विनाअनुदानित महाविद्यालयानी आकारण्यात येणारे विकास शुल्क यामध्ये ५० टक्के सुट देण्यात येवून, विद्यार्थ्यांकडे मागील सत्रामध्ये प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात आली आहे.

Previous article‘या’ विभागात १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच; दत्तात्रय भरणेंची माहिती
Next articleआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय